Ajit Pawar : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी पक्षाच्या दोन महत्त्वाच्या कार्यकर्त्यांनी दांडी मारल्याचे लक्षात येताच अजितदादांचा पारा चढला. "स्वतःला डायरेक्टर आणि आईला नगरसेवक करून घेतले आणि आता काम झाल्यावर सभेला गायब? हे असं चालणार नाही," अशा कडक शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना तंबी दिली.
राजकीय वारसा आणि विकासाचा रोडमॅप
सभेत बोलताना अजित पवार यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा आणि भविष्यातील विकासकामांचा पाढा वाचला. "मला शरद पवार साहेब आणि राजीव गांधी यांच्यामुळे राजकारणात मोठी संधी मिळाली, त्यामुळे मी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही," असे त्यांनी स्पष्ट केले. बारामतीत 394 कोटींचे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, 325 कोटींचे कॅन्सर हॉस्पिटल आणि 525 कोटींचे पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी त्यांनी तांदूळवाडी येथे 10 ते 12 एकर जागेवर अद्ययावत सायन्स पार्क उभारले जाणार असून पुणे जिल्ह्यातील 2 हजार शाळांचा विकास करण्याचा मानस असल्याचे सांगितले.
हेही वाचा - Sindhudurg ZP News : कोकणात राणेंची 'फिल्डिंग' यशस्वी! जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा 'बिनविरोध' डंका; ठाकरे गटाला मोठा धक्का
"जमिनी विकू नका, उलट तिथे विकत घ्या!"
दरम्यान, पुरंदरच्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत अजित पवारांनी स्थानिकांना महत्त्वाचा सल्ला दिला. अजित पवार म्हणाले, '3200 एकरवर दुहेरी धावपट्टीसह हे जगातील 19 व्या क्रमांकाचे आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे विमानतळ असेल. 94 टक्के लोकांनी या प्रकल्पाला संमती दिली आहे. इथे मोठा कायापालट होणार आहे, त्यामुळे कुणीही घाईत जमिनी विकू नका. शक्य असल्यास तिथे गुंतवणूक करा,' असे आवाहन त्यांनी केले.
हर्षवर्धन पाटलांशी युती आणि राजकीय टोलेबाजी
विरोधकांशी झालेल्या मनोमिलनावर भाष्य करताना दादा म्हणाले, "मी आणि हर्षवर्धन पाटील एकत्र आलो तर बिघडलं कुठं? आम्ही कायम भांडतच बसायचं का?" तसेच, आपण 'हलक्या कानाचा' माणूस नसून आपला व्याप कितीही वाढला असला तरी बारामतीतील प्रत्येक घडामोडीवर आपले बारीक लक्ष असते, असा इशाराही त्यांनी विरोधकांना आणि स्वकीयांना दिला.
लग्नाचा आणि छत्रपती कारखान्याचा किस्सा
आपल्या सुरुवातीच्या काळातील आठवणींना उजाळा देताना त्यांनी मिश्किल टिप्पणी केली. "छत्रपती कारखान्याचा चेअरमन होण्याचे माझे स्वप्न होते, पण नशिबाने माळेगावची धुरा हाती आली. माझे लग्न झाले नव्हते तेव्हा मी संचालक झालो होतो, कदाचित संचालक झालो म्हणूनच माझे लग्न जमले," असे म्हणताच सभेत एकच हशा पिकला.