Tuesday, February 17, 2026 08:44:58 AM

Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी गुड न्यूज; नेमकं कुठे होणार नवीन स्टेशन? पाहा प्रवाशांना मिळणाऱ्या 'या' आधुनिक सुविधा

विशेष म्हणजे, या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देताना द्वितीय श्रेणीच्या तिकीट दरात कोणतीही वाढ केली जाणार नाही.

mumbai local train मुंबईकरांसाठी गुड न्यूज नेमकं कुठे होणार नवीन स्टेशन पाहा प्रवाशांना मिळणाऱ्या या आधुनिक सुविधा

मुंबई: पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी, विशेषतः नालासोपारा आणि वसई-विरार पट्ट्यातील लाखो चाकरमान्यांसाठी एक सुखद बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वाढत्या लोकसंख्येमुळे आणि लोकलच्या प्रचंड गर्दीमुळे त्रस्त असलेल्या प्रवाशांना आता मोठा आराम मिळणार आहे. नालासोपारा येथील अलकापुरी परिसरात एका नवीन रेल्वे स्थानकाची उभारणी करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यामुळे नालासोपारा स्थानकावर होणारी गर्दी विभागली जाऊन प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

‘अमृत भारत’ अंतर्गत कायापालट

हे नवीन स्थानक केवळ नावालाच नसेल, तर ते ‘अमृत भारत रेल्वे स्थानक योजना’ अंतर्गत अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असणार आहे. यामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी स्वयंचलित जिने (Escalators), सुव्यवस्थित तिकीट तपासणी यंत्रणा आणि सुरक्षित प्रवासासाठी आधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. “वाढती लोकसंख्या लक्षात घेता, वाहतुकीवरील ताण कमी करणे ही काळाची गरज आहे,” असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले.

हेही वाचा: Santosh Dhuri: "मनसे कार्यकर्त्यांचा फक्त वापर..." संतोष धुरींनी आरोप करत सांगितलं मनसेच्या पराभवामागची 'इनसाईड' स्टोरी

अडीच किलोमीटरवर स्थानकांचे जाळे

सध्या वसई-विरार पट्ट्यात दोन रेल्वे स्थानकांमधील अंतर साधारण पाच किलोमीटर इतके आहे, ज्यामुळे मधल्या भागात राहणाऱ्या नागरिकांना प्रवासासाठी कसरत करावी लागते. हे अंतर कमी करण्यासाठी आता दर दोन  ते अडीच किलोमीटरवर नवीन स्थानक उभारण्याचे धोरण सरकारने आखले आहे. या धोरणात्मक योजनेची सुरुवात ‘अलकापुरी’ येथील नव्या स्थानकापासून होणार असून, भविष्यात रेल्वे नेटवर्क अधिक सक्षम बनवण्यावर भर दिला जाणार आहे.

अल्प दरात ‘AC’ लोकलचा प्रवास

प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे, राज्य आणि केंद्र सरकारच्या 50 - 50 टक्के भागीदारीतून लवकरच वातानुकूलित (AC) डबे आणि स्वयंचलित दरवाजे असलेल्या लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देताना द्वितीय श्रेणीच्या तिकीट दरात कोणतीही वाढ केली जाणार नाही. यामुळे मध्यमवर्गीय आणि कष्टकरी प्रवाशांना कमी खर्चात वातानुकूलित प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.

डिजिटल पर्यायांचा वापर करण्याचे आवाहन

स्थानकावरील रांगा कमी करण्यासाठी प्रवाशांनी ATVM, अधिकृत बुकिंग काउंटर किंवा IRCTC च्या मोबाईल ॲपद्वारे तिकीट काढण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. यामुळे विनातिकीट प्रवासाला आळा बसेल आणि प्रवाशांचा वेळही वाचेल. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या निर्णयामुळे नालासोपारा-वसई परिसरात आनंदाचे वातावरण असून, हा प्रकल्प या भागाच्या विकासासाठी महत्वाचा निर्णय ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Raj Thackeray On BMC Election Result 2026 : निवडणूक सोपी नव्हती, धनशक्ती विरुद्ध शिवशक्ती... राज ठाकरे यांची फेसबुक पोस्ट


सम्बन्धित सामग्री