रायपूर: नागपूरच्या विजयानंतर टीम इंडियाने रायपूरमध्येही आपला डंका वाजवला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेत भारताने आपली विजयी घोडदौड कायम राखत न्यूझीलंडचा सात विकेट्सने धुव्वा उडवला. रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर धावांचा पाऊस पडला, पण अखेर भारताच्या आक्रमक फलंदाजीसमोर न्यूझीलंडने गुडघे टेकले. या विजयासह भारताने मालिकेत 2-0 अशी भक्कम आघाडी घेतली आहे.
सलामीची जोडी गडगडली, चाहत्यांचा श्वास रोखला
“सुरुवात अडखळती, पण शेवट गोड” याचा प्रत्यय आजच्या सामन्यात आला. 209 धावांच्या बलाढ्य आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर अभिषेक शर्मा भोपळाही न फोडता बाद झाला, तर संजू सॅमसन जीवनदानाचा फायदा न घेता सहा धावांवर तंबूत परतला. अवघ्या 1.1 षटकात भारत 2 बाद 6 अशा अवस्थेत सापडला आणि चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला.
हेही वाचा: Rashmi Thackeray : राज ठाकरेंचे शब्द ऐकून रश्मी ठाकरेंना अश्रू अनावर, पाहा भावनिक क्षणाचा व्हिडीओ
ईशान आणि सूर्याने किवी गोलंदाजांची पिसे काढली
दोन झटपट विकेट्सनंतर मैदानावर आलेल्या ईशान किशन आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर तुफान हल्ला चढवला. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 48 चेंडूत 122 धावांची अभेद्य भागीदारी रचत सामन्याचे चित्रच पालटले. ईशान किशनने 37 चेंडूत 4 षटकार आणि 9 चौकारांसह 82 धावा कुटल्या. ईशान बाद झाला तेव्हा भारताचा विजय जवळपास निश्चित झाला होता.
शिवम दुबेची फटकेबाजी आणि भारताचा दणदणीत विजय
ईशान किशननंतर मैदानात उतरलेल्या शिवम दुबेने कर्णधार सूर्यकुमार यादवला कडक साथ दिली. शिवमने 18 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 36 धावा केल्या.
दुसरीकडे, सूर्यकुमार यादवने आपला फॉर्म कायम राखत 37 चेंडूत 4 चौकार आणि 9 षटकारांसह नाबाद 82 धावा ठोकल्या. या त्रिकुटाच्या जोरावर भारताने 209 धावांचे लक्ष्य 28 चेंडू शिल्लक ठेवत, 15.2 षटकांत सहज पूर्ण केले.
न्यूझीलंडची झुंज अपयशी
याआधी नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकांत 6 बाद 208 धावा केल्या होत्या. रचीन रवींद्र (44) आणि कर्णधार मिचेल सँटनर (नाबाद 47) यांनी संघाला सन्मानजनक धावसंख्या मिळवून दिली. भारताकडून कुलदीप यादवने 2 विकेट्स घेतल्या. मात्र, भारतीय फलंदाजांच्या झंझावातापुढे न्यूझीलंडची धावसंख्या आणि गोलंदाजी दोन्ही तोकडी ठरली. मालिकेत 2-0 आघाडी घेतल्याने आता भारतीय चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
हेही वाचा: Nashik : मोठी बातमी! 400 कोटींच्या कंटेनर लुटीप्रकरणी ठाण्यातील बिल्डर संशयाच्या भोवऱ्यात, तरुणाने केला खुलासा