नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील आराई गावात मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर गावात भूत फिरत असल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण झाले होते. गावात भुताचा वावर असल्याचे संदेश, फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. सोशल मीडियावर पसरविण्यात आलेल्या या पोस्ट्स आणि व्हिडीओंमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक नागरिक रात्री घराबाहेर पडण्यासही घाबरू लागले होते. यानंतर गावातील काही तरुणांनी तसेच पोलीस प्रशासनानेही परिस्थितीची गंभीर दखल घेत रात्रीच्या वेळी गस्त घालण्यास सुरुवात केली. परंतू कुठेही संशयास्पद हालचाल किंवा भूत असल्याचे कोणतेही पुरावे आढळून आले नाहीत, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे ही अफवा असल्याचे समोर आले आहे. तसेच या सोशल मीडियावर अशा प्रकारच्या अफवा पसरवून गावात भीती निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला असून पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून अशा खोट्या संदेशांवर आणि व्हिडीओंवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा : प्रेमाचा खेळखंडोबा! आधी होणाऱ्या जावयासोबत पलायन, नंतर दागिने आणि पैसे घेऊन बहिणीच्या नवऱ्यासोबत पसार; त्या महिलेचा शोध सुरू
दरम्यान, हे फोटो आणि व्हिडीओ जुने असून काही फोटो एआयच्या माध्यमातून तयार करून पसरविण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अफवांवर विश्वास ठेवू नये, कुठलाही संशयास्पद मेसेज, फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर फॉरवर्ड करू नये. अशा प्रकारच्या अफवा समाजात भीती पसरवण्यास कारणीभूत ठरतात आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे.