Shahaji Khupse : महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेना महायुतीने मोठे यश मिळवले असले तरी, एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच बाहेकिल्ल्यात एक मोठा राजकीय धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे ज्या वॉर्डमध्ये राहतात, तिथेच त्यांच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. प्रभाग क्रमांक 13 मधील अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार शहाजी खुपसे यांनी 'जाएंट किलर' ठरत माजी महापौर अशोक वैती यांचा पराभव केला आहे.
विजयाचे गुपित; केवळ विकासकामांवर भर
या ऐतिहासिक विजयानंतर बोलताना शहाजी खुस्पे यांनी आपल्या यशाचे गुपित उघड केले. 'मी निवडणुकीत कुणावरही वैयक्तिक टीका केली नाही, मी फक्त केलेल्या विकासकामांवर बोललो. प्रभागातील जनतेच्या हाकेला मी नेहमी धावून जातो आणि मतदारांनी त्याच विश्वासाचे फळ मला दिले आहे,' असे खुपसे यांनी नमूद केले. प्रभाग क्रमांक 13 (A) मध्ये खुपसे यांना 12,860 मते मिळाली, तर शिवसेनेचे दिग्गज उमेदवार अशोक वैती यांना 12,193 मतांवर समाधान मानावे लागले. खुपसेंनी वैती यांचा 667 मतांनी पराभव करत शिंदेच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा भगवा फडकवला.
हेही वाचा - Standing Committee Chairman: महापौर नव्हे तर स्थायी समिती अध्यक्षच खरे सत्ताकेंद्र? पालिकेतील निर्णयशक्तीचा सविस्तर उलगडा
प्रभाग क्रमांक 13 मधील इतर निकाल
दरम्यान, प्रभाग क्रमांक 13 मधील एकूण 4 जागांपैकी तीन जागांवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपले वर्चस्व कायम राखले असले तरी, एका महत्त्वाच्या जागेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने बाजी मारली. प्रभाग क्रमांक 13 (ब) मध्ये शिवसेनेच्या निर्मला कणसे यांनी शिवसेना (उबाठा) उमेदवार अनिता हिंगे यांचा पराभव केला. तर 13 (क) शिवसेनेच्या वर्षा शेलार यांनी शिवसेना (उबाठा) उमेदवार वैशाली घाटवळ यांच्यावर विजय मिळवला. तर प्रभाग क्रमांक 13 (ड) मध्ये शिवसेनेचे अनिल भोर यांनी शिवसेना (उबाठा) उमेदवार संजय दळवी यांना पराभवाची धूळ चारली.
हेही वाचा - Uddhav Thackeray On BMC Election Result : 'रिकाम्या खुर्च्यासुद्धा निवडणूक जिंकवून देतात, हे पहिल्यांदाचं पाहिलं'; उद्धव ठाकरेंचा भाजपला सणसणीत टोला
शिंदेच्या बालेकिल्ल्यात चर्चेला उधाण
ठाणे महापालिकेत जरी शिंदेंच्या शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व राहिले असले, तरी स्वतः शिंदे राहत असलेल्या वॉर्डमध्येच माजी महापौरांचा झालेला पराभव राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. या विजयामुळे शिवसेना (उबाठा) गोटात मोठे उत्साहाचे वातावरण आहे.