PM Modi on Nehru In Parliament : वंदे मातरम गीताच्या 150 वर्षांच्या निमित्ताने लोकसभेत झालेल्या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर सभागृहातील वातावरण चांगलेच तापले. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याला थेट आव्हान दिले. तथापी, यावेळी त्यांनी मोदींच्या मागील काही भाषणातील आकडेवारी वापरून जोरदार प्रत्युत्तर दिले.
पंतप्रधानांच्या भाषणाचा उद्देश इतिहासाला वेगळे वळण देणे
भाषणाला सुरुवात करताना गोगोई म्हणाले की, पंतप्रधान मोदींचे आजचे भाषण काळजीपूर्वक ऐकले असता दोन गोष्टी स्पष्ट जाणवत होत्या. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी असा सूर लावला की जणू त्यांचे राजकीय वारस स्वतः स्वातंत्र्यलढ्यात लढत होते. इतिहास नव्याने लिहिण्याचा हा प्रयत्न ठळकपणे जाणवतो. गोगोईंच्या मते, पंतप्रधानांच्या भाषणाचा दुसरा उद्देश संपूर्ण चर्चेला राजकीय पातळीवर खेचण्याचा होता. वंदे मातरमवरील चर्चेतही त्यांनी काँग्रेस वर्किंग कमिटी आणि नेहरूंवर आरोप ठेवले. आणि हे त्यांचे नेहमीचे झाले आहे, असेही गोगोई यांनी यावेळी नमूद केलं.
हेही वाचा - IndiGo Crisis: 'दोष FDTL नियमांचा नाही तर...'; केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्याने राज्यसभेत सांगितलं इंडिगोच्या संकटामागील खरं कारण
कोणत्याही विषयावर ते बोलले तरी नेहरू आणि काँग्रेसचं नाव न घेता त्यांचे भाषण पूर्णच होत नाही, अशी टीका गोगोईंनी यावेळी केली. यावेळी गोगोई यांनी पंतप्रधान मोदींच्या गेल्या काही भाषणातील आकडेही वाचून दाखवले:
ऑपरेशन सिंदूरच्या चर्चेत - 14 वेळा नेहरू, 50 वेळा काँग्रेसचे नाव
संविधानाच्या 75 व्या वर्धापनदिनी - 10 वेळा नेहरू, 26 वेळा काँग्रेसचे नाव
2022 राष्ट्रपती अभिभाषणावरील भाषणात - 15 वेळा नेहरूंचे नाव
2020 राष्ट्रपती अभिभाषणाच्या वेळी - 20 वेळा नेहरूंचे नाव
नेहरूंच्या योगदानावर काळा डाग लावणे अशक्य
दरम्यान, पंतप्रधानांनी वंदे मातरमच्या इतिहासावर केलेल्या टीकेला विरोध करत गोगोई म्हणाले की, तुम्ही कितीही आरोप केले तरी पंडित नेहरूंच्या योगदानावर डाग लागू शकत नाही. मुस्लिम लीगने वंदे मातरमविरोधात आवाज उठवला म्हणून काँग्रेसने त्यांचे ऐकले, असा दावा चुकीचा आहे. ते पुढे म्हणाले की, मुस्लिम लीग देशाचे भविष्य ठरवणारी शक्ती नव्हती आणि काँग्रेसने कधीच त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले नाही. उलट मौलाना अबुल कलाम आझाद यांसारखे आमचे नेते स्पष्टपणे म्हणत होते की, वंदे मातरमबाबत त्यांना कुठलाही विरोध नाही.
हेही वाचा - Vande Mataram Debate: 'मुस्लिम लीगच्या दबावाखाली काँग्रेसने वंदे मातरमचे तुकडे केले’; लोकसभेत पंतप्रधान मोदींचा नेहरूंवर हल्लाबोल
1937 च्या काँग्रेस समितीचा निर्णय
गोगोईंनी स्पष्ट केले की दबाव असूनही 1937 मध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीने प्रत्येक राष्ट्रीय संमेलनाच्या सुरूवातीला वंदे मातरमच्या पहिल्या दोन ओळी गाण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयावर मुस्लिम लीगनेही टीका केली आणि हिंदू महासभेनेही. कधी कधी दोघांचे राजकीय उद्दिष्टही सारखे होते. पण काँग्रेस हा कोणाच्याही दबावाखाली चालणारा पक्ष नव्हता.