Saturday, May 17, 2025 10:04:17 PM

मुंबईतील काही भागात शनिवार-रविवारी पाणीकपात; महापालिकेची जलवाहिनीसंबंधी कामे

घाटकोपरमधील जलवाहिन्यांच्या दुरुस्तीमुळे 26-27 एप्रिलदरम्यान 'एन' व 'एल' विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा 24 तास पूर्णतः बंद राहणार आहे.

मुंबईतील काही भागात शनिवार-रविवारी पाणीकपात महापालिकेची जलवाहिनीसंबंधी कामे

मुंबई: मुंबईकरांसाठी उन्हाळ्याचे चटके फक्त तापमानापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. आता ऐन उन्हाळ्यात मुंबईच्या काही भागांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. महापालिकेच्या जल अभियंता विभागाकडून घाटकोपर पश्चिमेकडील जलवाहिन्यांवर देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यात येणार असून त्याचा परिणाम म्हणून शनिवार, 26 एप्रिल सकाळी 10 वाजल्यापासून ते रविवारी, 27 एप्रिल सकाळी 10 वाजेपर्यंत म्हणजेच 24 तास काही भागांचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, जलवाहिन्यांवरील या देखभाल दुरुस्तीच्या कामात घाटकोपर येथील संत तुकाराम पुलाजवळील 1500 मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर 1200 मिलीमीटर व्यासाची नवी झडप बसवली जाणार आहे. याशिवाय घाटकोपर उच्चस्तर जलाशयाच्या इनलेटवर 1400 मिलीमीटर व्यासाची झडप बसविणे, चार क्रॉस कनेक्शन जोडणे आणि दोन जुनी जलवाहिन्या दुरुस्त करणे अशी विविध कामे या कालावधीत केली जाणार आहेत. या महत्त्वपूर्ण कामांमुळे ‘एन’ व ‘एल’ विभागातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

महापालिकेने नागरिकांना विनंती केली आहे की, त्यांनी या कालावधीत पाणी जपून वापरावे आणि आवश्यक ती साठवणूक करून ठेवावी. अचानकपणे पाणीबंदीस सामोरे जावे लागू नये यासाठी पालिकेने वेळेवर सूचना दिल्या असून, नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

‘एल’ विभागातील पाणीबंद क्षेत्र:

‘एल’ विभागातील असल्फा गाव, एन. एस. एस. मार्ग, होमगार्ड वसाहत, नारायणनगर, साने गुरुजी उदंचन केंद्र, हिल नंबर 3, अशोक नगर, हिमालय सोसायटी, संजयनगर, समतानगर, गैबण शाह बाबा दर्गा मार्ग, संघर्षनगर, खैराणी मार्ग, यादवनगर, जे. एम. एम. मार्ग, लक्ष्मीनारायण मंदिर मार्ग, कुलकर्णी वाडी, मोहिली जलवाहिनी, भानुशालीवाडी, परेरावाडी या भागात पाणी बंद राहणार आहे.

या पाणीबंदीत घरगुती वापरावरच नव्हे तर विविध छोट्या व्यवसायांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या जल अभियंता विभागाचे अधिकारी सांगतात की, ही कामे दीर्घकालीन फायदा देणारी असून, भविष्यातील पाण्याच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ही सुधारणा आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी तात्पुरत्या त्रासाला समजून घेत सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
 


सम्बन्धित सामग्री