Sunday, August 17, 2025 05:16:38 PM

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसा दर्जासाठी महाराष्ट्र शिष्टमंडळाचा पॅरिस दौरा

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ युनेस्कोकडे प्रभावी सादरीकरण करणार

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसा दर्जासाठी महाराष्ट्र शिष्टमंडळाचा पॅरिस दौरा
12 किल्ल्यांच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेशासाठी महाराष्ट्र सरकारचा महत्त्वपूर्ण प्रयत्न

शिवकालीन किल्ल्यांना जागतिक ओळख मिळणार? महाराष्ट्र शिष्टमंडळाचा पॅरिस दौरा!

मुंबई, दि. 23 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ यासाठी आज पॅरिसला रवाना झाले आहे.

महाराष्ट्र शासनाने 'मराठा लष्करी भूप्रदेश' (Maratha Military Landscape of India) या संकल्पनेअंतर्गत या किल्ल्यांसाठी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट होण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. या ऐतिहासिक किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि तामिळनाडूमधील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे.

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचे आभार
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-किल्ल्यांचा जागतिक स्तरावर सन्मान व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने हा ठोस निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवला आहे. त्याबद्दल आणि या ऐतिहासिक क्षणी महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी दिल्याबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

शिष्टमंडळाचे पॅरिस दौऱ्याचे उद्दिष्ट
या योजनेच्या अनुषंगाने, महाराष्ट्र शासनाचे चार सदस्यीय शिष्टमंडळ २२ ते २६ फेब्रुवारी, २०२५ या कालावधीत पॅरिस, फ्रान्स येथे अधिकृत सादरीकरण करणार आहे. या शिष्टमंडळाचे नेतृत्व सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार करणार असून, त्यांच्यासोबत अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद श्रीमती शिखा जैन हे सदस्य आहेत.

या दौऱ्यात, महाराष्ट्र सरकारच्या शिष्टमंडळाकडून युनेस्कोसमोर तांत्रिक व राजनैतिक सादरीकरण प्रभावीपणे करण्यात येणार आहे. यामुळे या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले जाईल.

किल्ल्यांना जागतिक ओळख मिळण्याची संधी
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत हे किल्ले समाविष्ट झाल्यास त्यांच्या जतन, संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी अधिक संधी निर्माण होतील. या ऐतिहासिक स्थळांमुळे महाराष्ट्रातील स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल आणि मराठा इतिहासाचे जागतिक स्तरावर अधिक दृढीकरण होईल.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचा वारसा जपण्यासाठी या पॅरिस दौऱ्याला ऐतिहासिक महत्त्व असून, महाराष्ट्र शासनाने हे पाऊल उचलून आपल्या समृद्ध संस्कृतीचा जागतिक स्तरावर विस्तार करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी आशा मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.

'राज ठाकरेंची महायुतीला आवश्यकता नाही' कोण म्हणाले ?


सम्बन्धित सामग्री