Rajasthan Crime: घर पोहोचायच्या आधीच नववधू बेपत्ता, ट्रेनच्या टॉयलेटमध्ये काय घडलं?
पाली (राजस्थान) : राजस्थानच्या पाली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या २० दिवसांच्या संसारानंतरच नवरी अचानक गायब झाली आणि नवरा न्यायासाठी दरवाजे ठोठावत आहे. हा प्रकार आहे जितेंद्र दास (२१) नामक युवकाशी घडला. त्याने लाखो रुपये खर्च करून उत्तर प्रदेशातील एका मुलीशी विवाह केला. पण या नवरीने थेट रेल्वेच्या टॉयलेटमधून पळ काढून नवऱ्याची फसवणूक केली आहे.
जितेंद्र हा मूळचा राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो पंजाबमध्ये मिठाईची दुकान चालवतो. तिथेच त्याची ओळख इरशाद नावाच्या व्यक्तीशी झाली. इरशादने त्याला चांगल्या मुलीशी विवाह लावून देण्याचे आमिष दाखवले. पण त्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागेल असे सांगितले. अखेर ३.५ लाख रुपये घेऊन १३ डिसेंबर २०२४ रोजी प्रियंका नावाच्या मुलीशी त्याचा विवाह लावण्यात आला. विवाह विधी पूर्ण झाले. नवरी सासरवाडीही आली आणि काही दिवस सर्व काही सुरळीत सुरू होते.
हेही वाचा - सोन्याच्या तस्करीत कन्नड अभिनेत्री अडकल्याने खळबळ! 14.8 किलो सोन्यासह विमानतळावर अटक
लग्नानंतर काही दिवस नवरा-बायको सुखी संसार करत होते. पण ४ जानेवारीला इरशादचा फोन आला. तेव्हा प्रियंकाच्या वडिलांची तब्येत खूप खराब आहे, तिला घरी पाठवावे लागेल, असे सांगितले. जितेंद्रने पत्नीला बनारसला सोडण्यासाठी रेल्वेने प्रवास केला. तिथे ४ दिवस दोघे थांबले. पण खरी फसवणूक झाली ती ८ जानेवारीला. पालीला परतण्यासाठी जितेंद्र व प्रियंका रेल्वेतून निघाले. पण ट्रेन आग्रा स्टेशनवर पोहोचताच प्रियंका अचानक टॉयलेटला जाण्याचा बहाणा करत उठली. काही वेळ वाट पाहिल्यानंतरही ती परतली नाही. जितेंद्रने तिला शोधण्यासाठी ट्रेनभर शोधाशोध केली. पण तिचा काहीही पत्ता लागला नाही.
हेही वाचा - भयानक! आधी लोखंडी रॉड गरम केला मग त्याच रॉडने एकाला चटके देत मारले
फोन बंद.. पैसे आणि दागिनेही गायब
घटनेनंतर जितेंद्रने तातडीने प्रियंकाच्या वडिलांना व इरशादला फोन लावण्याचा प्रयत्न केला. पण सर्वांचे फोन बंद होते. घरी परत आल्यावर त्याला आणखी एक धक्का बसला. घरातील ५० हजार रुपये आणि सोन्याचे दागिने गायब होते. आपली फसवणुकीची जाणीव होताच जितेंद्रने पोलिसांत तक्रार दाखल केली.