मुंबई: 1 मे 2025 रोजी, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा 12 वा वर्धापनदिन साजरा केला. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी आता 13 व्या वर्षांत पदार्पण करतेय. या पार्श्वभूमीवर, जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीच्या कार्यालयामध्ये अनेक दिग्गज मंडळींनी भेट दिली. त्यापैकीच एक म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनीदेखील जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या 12 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून या वृत्तवाहिनीच्या कार्यालयाला भेट दिली. या दरम्यान, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक आशुतोष पाटील यांनी दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासोबत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या कामकाज आणि त्याच्या ध्येयाविषयी महत्वाची चर्चा केली.
हेही वाचा: जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या 12 व्या वर्धापनदिनानिमित्त अभिनेता स्वप्नील जोशींनी दिली भेट
दिग्दर्शक बनले पाहुणे संपादक (Guest Editor):
यावेळी, मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधत त्यांच्या कामाचा आढावा घेतला. यानंतर, संपादक आशुतोष पाटील यांनी दिग्दर्शक शिंदे यांना विनंती करत म्हणाले , 'मी आपणांस विनंती करतो की आज तुम्ही आम्हे गेस्ट एडिटर (पाहुणे संपादक) व्हा आणि तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करणार आहात'. यावेळी, दिग्दर्शक शिंदे यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या इनपुट आणि आऊटपुट टीम सोबत संवाद साधला.
त्यानंतर, मुंबईचे ब्युरो प्रमुख पंकज दळवी यांनी दिग्दर्शक केदार शिंदे यांना आजच्या ठळक बातम्या सांगितल्या. त्यानंतर इनपुट डिपार्टमेंट मधील कर्मचाऱ्यांनी दिग्दर्शक शिंदेंना बातम्यांबाबत माहिती दिली. त्यानंतर, ब्युरो प्रमुख दळवी यांनी बातम्यांचा आढावा दिल्यानंतर दिग्दर्शक शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली की, 'महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मराठी माणूस काश्मीरमध्ये जाऊन या घटनेचा तपास करतो ही फार मोठी गोष्ट आहे'. त्यानंतर, न्यूज प्रोड्युसर पूजा उजागरे यांनी दिग्दर्शक शिंदे यांना आउटपुट डिपार्टमेंटच्या कामकाजाविषयी माहिती दिली आणि त्यासोबतच, त्यांनी महत्वाची बातमी देखील सांगितली. त्यानंतर, दिग्दर्शक शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली की, 'मला असं वाटतं की, महाराष्ट्र दिन आहे. त्यामुळे, सर्वप्रथम आपण लोकांसमोर सकारात्मक गोष्टी मांडूया. पहलगाम येथे घडलेली घटना ही अत्यंत दुःखद आहे. पण तरीही आज मराठी पाऊल पडलं आहे. त्यासोबतच मराठी माणसाने तेथील तपास केले आहे, जी काही यंत्रणा आहेत, त्याच्यासाठी लीड घेतलेली, त्यातली ती सदानंद दातेंची बातमी सर्वात पहिले यावी असं मला वाटतं. त्यानंतर, मला दुसरी महत्वाची बातमी वाटते आणि ते म्हणजे शाळांची. याचं कारण म्हणजे, प्रत्येकाला शाळेंबद्दलची काळजी आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेसाठी देखील ही एक महत्वाचं पाऊल आहे असं वाटेल की आपली मुलं ज्या शाळेत पाठवतोय, त्या शाळेमध्ये आपली मुलं व्यवस्थित शिकत आहेत की नाही? याची देही याची डोळा पाहता येईल आणि त्याबरोबर मला ह्या प्रगतिपुस्तकाचं बरं वाटतं. 100 दिवस झाले, आपल्याला शाळेमध्ये सवय असते की मुलं किती शिकली, त्याच्या प्रगतीपुस्तकावर किती गुण मिळाले याची उत्सुकता असते. त्याप्रमाणे, महाराष्ट्राच्या जनतेलाही त्याच्याबद्दल कुतूहल असतं'.
'झापूक झुपुक' चित्रपटाबद्दल दिग्दर्शक शिंदेंची प्रतिक्रिया:
'बिग बॉस या कार्यक्रमामध्ये त्याला बघितल्यानंतर, 'झापूक झुपुक' या चित्रपटाच्या कथानकासाठी मला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाण योग्य वाटला. म्हणजे त्याला हिरो बनवण्यासाठी हा सिनेमा मुळातच नव्हता. पण ही गोष्ट जेव्हा माझ्या मनामध्ये आली, तेव्हा मला असं वाटलं की तो योग्य आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही ते बघाल, तेव्हा तुम्हाला जाणवेल की तो या भूमिकेसाठी किती महत्वाचा होता' अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक केदार शिंदे यांनी दिली.