मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात सोमवारी मध्यरात्री ते मंगळवारी पहाटेपर्यंत आठ जिल्ह्यांतील २८ मंडळांत धुवाधार पाऊस बरसला. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील काही मंडळांचा यात समावेश असून, ५६० गावे या पावसामुळे चिंब झाली. दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात आजवर २६ जणांचा बळी गेला आहे, यात विविध दुर्घटनांचा समावेश आहे. बळीराजा सुखावला, विभागातील प्रकल्पांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. मराठवाड्यात गेल्या ३९ दिवसांत पावसाने २६ बळी घेतले आहेत. यात पाण्यात वाहून जाणे, वीज पडून मृत्यू होण्याच्या घटनांचा समावेश आहे. लहान, मोठी मिळून ३८५ जनावरे दगावली. ५५ गोठे पावसाने पडले तर ४९५ मालमत्तांचे नुकसान झाले. १२०८ शेतकऱ्यांच्या ९२२ हेक्टर जिरायत जमिनीचे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे.