Jharkhand wine shop scam प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image
धनबाद: धनबादमधून अत्यंत धक्कादायक आणि आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे. बलियापूरच्या प्रधानखंटा भागातील एका वाइन शॉपमध्ये तब्बल 802 दारूच्या बाटल्या गायब झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, या घटनेबाबत जबाबदारी उंदरांवर टाकण्यात आली आहे. दुकानात सुरू असलेल्या स्टॉक मॅचिंग, हँडओव्हर-टेकओव्हर आणि विक्री तपासणी प्रक्रियेदरम्यान हे प्रकरण उघडकीस आले. उत्पादन शुल्क विभागाने दुकानाचं ऑडिट करताना स्टॉकची तपासणी केली असता अनेक बाटल्या गायब किंवा फुटलेल्या अवस्थेत सापडल्या.
उंदरांनी दारू प्यायली?
दरम्यान, जेव्हा अधिकाऱ्यांनी दुकानातील कर्मचाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली, तेव्हा त्यांनी यामागे उंदरांचा हात असल्याचं सांगितलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे उंदीर दुकानात शिरले आणि त्यांनी दारूच्या बाटल्या फोडून त्यामधील दारू प्यायली. धनबादमधील या घटनेमुळे सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे.
हेही वाचा - 'मी आजपासून मुक्त झालो...'; घटस्फोटानंतर पतीने 40 लिटर दुधाने केली आंघोळ
याआधी उंदरांनी गांजा फस्त केल्याचा आरोप -
तथापी, उंदरांवर अशा प्रकारचे आरोप लावण्याची ही पहिलीच वेळ नाही. कारण, काही दिवसांपूर्वी धनबादमधील राजगंज पोलीस ठाण्यात जप्त केलेला गांजा उंदरांनी खाल्ला, असा आरोप करण्यात आला होता. आता दारूच्या साठ्यावर देखील त्यांच्यावरच बोट दाखवलं जात आहे.
हेही वाचा - 10,000 मुलांचा बाप.. 700 किलो वजन.. वय 124! याच्यावर संशोधन करणंही झालंय कठीण.. काय आहे कारण?
उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केलं आहे की, साठ्यात तफावत आढळल्यास जबाबदारी कर्मचाऱ्यांचीच असेल. उंदीर असोत वा कुणीही, भरपाई स्टाफकडूनच वसूल केली जाईल. ही घटना हास्यास्पद असली तरी ती एक गंभीर बाब अधोरेखित करते. उंदरांना दोष देऊन जबाबदारी टाळणं ही प्रशासनासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.