मुंबई: ‘जसे आम्ही पक्ष फोडतो, तसे तुम्ही विद्यार्थी फोडा' असा मिश्कील सल्ला मंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना दिला आहे. विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्याच्या उद्देशाने दिलेलं हे विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
जळगाव ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुमारे 45 हजार विद्यार्थी आहेत. परंतु, गेल्या काही वर्षांत त्यात विशेष वाढ झालेली नाही. याच पार्श्वभूमीवर 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या संकल्पनेअंतर्गत आयोजित केलेल्या शाळा पुरस्कार वितरण सोहळ्यात मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते.
त्यांनी पुढे म्हटलं, 'माझ्या आयुष्यात मी अनेकांना त्रास दिला, पण तो तात्पुरता असायचा आणि मी लगेच विसरून जायचो. मात्र, मी कधीच शिक्षकांना त्रास दिला नाही. शिक्षकांबद्दल आमच्या मनात नेहमीच एक विशेष आदर आहे.'
गुलाबराव पाटील यांनी शिक्षणव्यवस्थेतील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना सांगितलं, 'जर आपण मराठी शाळांमधील पटसंख्या टिकवू शकलो असतो, तर आज 50 हजार डीएड झालेली मुलं नोकरीला लागली असती.'
आपल्या वादग्रस्त विधानावर सारवासारव करत ते पुढे म्हणाले 'मी ते विधान विनोदाने केलं होतं. जसं आम्ही इतर पक्षातील कार्यकर्ते आमच्या पक्षात आणतो, तसं शिक्षकांनी इतर शाळांमधून विद्यार्थी आपल्या शाळेत आणावेत, एवढाच त्यामागचा हेतू होता. त्यात काही चुकीचा अर्थ घ्यायची गरज नाही,' असंही त्यांनी स्पष्ट केलं.