वर्धा: वर्धा जिल्ह्यातील आमला परिसरात उष्णतेचा प्रचंड कहर पाहायला मिळत असून, याचा गंभीर परिणाम पोल्ट्री व्यवसायावर झाला आहे. आमला येथील पोल्ट्री फार्ममध्ये तब्बल 1200 कोंबड्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अचानक आलेल्या विद्युत खंडिततेमुळे फॉर्ममधील तापमान झपाट्याने वाढले आणि त्यामुळे या कोंबड्यांचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे पोल्ट्री फॉर्मचे मालक सुरेश गेडाम यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
सुरेश गेडाम यांनी आमला परिसरात मोठ्या मेहनतीने 5000 कोंबड्यांचे पालन करणारा पोल्ट्री फॉर्म उभारला आहे. उन्हाळा असो वा हिवाळा, अशा फॉर्ममध्ये तापमान नियंत्रित ठेवणे अत्यंत आवश्यक असते. मात्र, हवामान आधीच तापलेले असताना अचानक वीजपुरवठा बंद पडल्याने शेडमधील तापमान प्रचंड वाढले. यामुळे एकाच वेळी 1200 कोंबड्यांचा मृत्यू झाला. ही घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली असून, स्थानिक शेतकरी वर्गामध्ये भीतीचं वातावरण आहे.
हेही वाचा: Maharashtra Weather : फिरण्यासाठी बाहेर पडत असाल, तर हे हवामान वृत्त नक्की वाचा
महावितरणच्या हलगर्जीमुळेच हे नुकसान झाल्याचा आरोप गेडाम यांनी केला आहे. अशा अपघातांपासून बचाव करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याची गरज अधिक तीव्रतेने जाणवते आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
हेही वाचा: नाशकात वाढत्या तापमानामुळे ट्रॅफिक सिग्नल दुपारी 1 ते 4 दरम्यान राहणार बंद