१ मे १९६० ही केवळ एक तारीख नव्हे, तर मराठी अस्मितेच्या झंझावातातून उदयास आलेल्या संयुक्त महाराष्ट्र राज्याची जन्मतारीख या मागे केवळ राजकीय नाही तर सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक व साहित्यिक संघर्षाची एक प्रदीर्घ परंपरा आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपण पाहणार आहोत या राज्य निर्मितीच्या थरारक आणि बलिदानी इतिहासाकडे एक नजर.
भाषावार प्रांतरचनेचा उगम
ब्रिटिशांनी भारताची प्रांतनिहाय विभागणी भाषेऐवजी प्रशासनिक सोयीनुसार केली होती. १९२० मध्ये महात्मा गांधींनी भाषावार प्रांत रचनेचा मुद्दा मान्य केला. लोकमान्य टिळकही याला पाठिंबा देत होते. मात्र स्वातंत्र्यानंतर नेहरूंना ही कल्पना राष्ट्रीय एकात्मतेला धोका वाटू लागली. विशेषतः मुंबईतील भांडवलदार व अमहाराष्ट्रीय गट हे मुंबईला महाराष्ट्रात समाविष्ट करण्यास ठाम विरोध करत होते.
सुरुवातीच्या मागण्या आणि माडखोलकरांचे प्रयत्न
१९३८-४० मध्ये ग. त्र्यं. माडखोलकरांनी संयुक्त महाराष्ट्राची गरज मांडली. त्यांनी सांगितले की महाराष्ट्र समाजात भूमिपुत्रांना उद्योग व व्यापारात स्थान नाही. १९४६ मध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली आणि राजकीय नेत्यांनी त्याला पाठिंबा दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संयुक्त महाराष्ट्र
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही संयुक्त महाराष्ट्राला सशक्त पाठिंबा दिला. त्यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही चळवळीतील एक घटक होती. त्यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या आणि चळवळीला गती दिली. १९४९ मध्ये डॉ. आर. डी. भंडारे आणि आचार्य अत्रे यांनी मुंबई महापालिकेत मुंबईसह महाराष्ट्र” ठराव मांडला.
दार आयोग (१९४८) आणि जेपीव्ही समिती यांनी महाराष्ट्र व मुंबईच्या मागणीला विरोध केला. फाजल अली आयोगानेही (१९५५) मुंबईला द्वैभाषिक प्रांत म्हणून ठेवण्याची शिफारस केली. त्यामुळे महाराष्ट्रभर मोठा जनआंदोलन उसळला.
पंडित नेहरूंनी जाहीर केलेल्या त्रिराज्य योजनेत मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चळवळ पेटली. सेनापती बापट, डॉ. आंबेडकर, प्र. के. अत्रे, एस.एम. जोशी, श्रीपाद डांगे, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख या सर्वांनी आपल्या कार्याने मराठी अस्मितेला बळ दिले.१९५५ मध्ये झालेल्या आंदोलनात पोलिस गोळीबारात १०८ आंदोलक हुतात्मा झाले.फ्लोरा फाउंटन येथे हुतात्मा स्मारक त्यांचे स्मरण म्हणून उभारले गेले.
भारताचे तत्कालीन अर्थमंत्री सी.डी. देशमुख यांनी संयुक्त महाराष्ट्रावरील अन्यायाच्या निषेधार्थ राजीनामा दिला. संयुक्त महाराष्ट्र समितीने १९५७ च्या निवडणुकीत १५५ जागा जिंकून काँग्रेसविरोधात मोठा आवाज निर्माण केला.
महाराष्ट्र राज्याचा अधिकृत जन्म
१ मे १९६० रोजी “मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र” राज्य अस्तित्वात आले. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. मुंबई ही राजधानी व नागपूर उपराजधानी ठरवण्यात आली.दुर्दैवाने, बेळगाव, निपाणी, कारवार, डांग, बिदर हे मराठीबहुल भाग महाराष्ट्रात येऊ शकले नाहीत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आजही प्रलंबित आहे.
संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती म्हणजे एक भाषिक, सांस्कृतिक आणि सामाजिक स्वाभिमानाची चळवळ होती. १०८ हुतात्म्यांचे बलिदान, साहित्यिकांचा पाठिंबा, नेत्यांचे नेतृत्व आणि जनतेचा अभूतपूर्व सहभाग या सर्वांची ही फळे होती.