राज्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात खळबळ उडवणारी घटना सोमवारी घडली. धनंजय मुंडे यांच्या अत्यंत निकटवर्तीय आणि व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेसचे संचालक असलेल्या राजेंद्र घनवट यांच्या पत्नी मनाली राजेंद्र घनवट यांचं वयाच्या 46व्या वर्षी आकस्मिक निधन झालं. त्यांचं निधन सोमवारी (21 एप्रिल 2025) रोजी पुण्यातील ज्युपिटर रुग्णालयात झालं असून, यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
या घटनेला एक वेगळं वळण मिळालं जेव्हा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर या मृत्यूबाबत गंभीर आरोप केले. 'ही आत्महत्या असून ती नैसर्गिक मृत्यू असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे,' असं दमानिया यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत खळबळ उडवून दिली. त्यांचं म्हणणं आहे की, मृत्यू संशयास्पदअसून, राजकीय प्रभावाखाली सत्य लपवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
राजेंद्र घनवट यांच्यावर आरोप काय?
राजेंद्र घनवट यांच्यावर आधीपासूनच जमिनीच्या व्यवहारात अनियमितता केल्याचे आरोप आहेत. अंजली दमानिया यांनी त्यांच्या आणि धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप करत, 11 शेतकऱ्यांची फसवणूक करून तब्बल 20 कोटींच्या जमिनीचा केवळ 8 लाखात व्यवहार केल्याचा आरोप केला आहे. याच प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी महसूल मंत्र्याकडे केली आहे.
मनाली घनवट यांच्यावर अंतिम संस्कार मंगळवारी (22 एप्रिल) सकाळी 9:30 वाजता पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत पार पडणार आहेत. त्यांच्या जाण्याने संपूर्ण घनवट कुटुंबीय व नातेसंबंधीयांमध्ये शोककळा पसरली आहे. मात्र या निधनामागे दडलेलं सत्य उलगडणार का, हा प्रश्न सध्या अनेकांच्या मनात घर करत आहे.