हैदराबाद: पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानवर वारंवार हल्लाबोल करत आहेत. अशातच, त्यांनी केंद्र सरकारकडे मागणी करत म्हटले की, 'जर केंद्र सरकारला खरोखरच पाकिस्तानविरोधात काही ठोस निर्णय घ्यायचे असतील, तर त्यांनी फक्त 'घर में घुस के मारेंगे', अशी घोषणा देऊन चालणार नाही. त्याऐवजी त्यांनी घरात घुसून बसले पाहिजे', असे म्हटले. 'पाकव्याप्त काश्मीर (PoK) आपल्या ताब्यात घ्यावा', अशी मागणी ओवैसींनी केंद्र सरकारकडे केली.
हेही वाचा: व्हिडिओ कॉल उचलला अन् सुरु झाला न्यूड ब्लॅकमेलचा खेळ, सेवानिवृत्त शिक्षकाची 14 लाखांची फसवणूक
घरात घुसून बसले पाहिजे:
जुन्या दहशतवादी हल्ल्यांचा उल्लेख करताना दहशतवादाविरोधात ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे, असे ओवैसी म्हणाले. '26/11 हल्ला झाला होता, पुलवामा हल्ला, त्यानंतर उरी, पठाणकोट आणि रियासी याठिकाणी दहशतवादी हल्ला झाला. तुमच्याकडे संपूर्ण विरोधी पक्ष दहशतवाद संपवण्याचे म्हणत आहे. दहशतवाद उखडून टाकण्यासाठी सर्व विरोधी पक्ष सरकारला सांगत आहेत. हा केवळ राजकीय मुद्दा नसून संपूर्ण देशाची एकजूट भावना आहे', असं त्यांनी म्हटले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा इशारा:
गुरुवारी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पाकिस्तानला इशारा देत म्हणाले की, 'मोदी सरकारचे दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचे धोरण आहे. त्यासोबतच, पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामध्ये जे कोणी सहभागी होते, त्या प्रत्येक दहशतवाद्याला एक एक करून मारले जाईल' असं त्यांनी सांगितले. 'त्यांनी भारतातील 27 लोकांना जीवे मारले आहेत, आणि त्यांना असे वाटत आहे की ही लढाई आम्ही जिंकली आहे, तर असं कोणीही समजू नये. मी त्यांना सांगू इच्छितो की प्रत्येक व्यक्तीला उत्तर मिळेल. जर कोणी भ्याड हल्ला करत असेल आणि हा आपला विजय आहे असं समजत असतील, त्यांनी हे समजून घ्यावं की बदल हा निवडकपणे घेतला जाईल. हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भारत आहे', असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.