नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली. यादरम्यान, भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक महत्वाची पावले उचलली. अशातच, सिंधू पाणी वाटप करार रोखल्यानंतर पाकिस्तानला दिवसा ढवळ्या तारे दाखवण्यासाठी भारताने आणखी एक टोकाचे पाऊल उचलले आहे. जम्मू आणि काश्मीर येथील चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे दरवाजे बंद करून भारताने पाकिस्तानला जाणारा पाणीपुरवठा रोखला. त्यासाठी बगलिहार धरणातील गाळ उपसण्याचे कारण भारताने दिले. या कारणामुळे पाकिस्तानच्या दिशेने जाणाऱ्या चिनाब नदीची पाण्याची पातळी बऱ्यापैकी कमी झाली. मात्र, यामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
पाण्यासाठी पाकिस्तान चिनाबवर अवलंबून:
पाकिस्तानमधील पंजाबचा मोठा भाग चिनाब नदीवर अवलंबून आहे, विशेषतः शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी. त्यामुळे भारताने घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर पाकिस्तान मेटाकुटीला येण्याची शक्यता आहे. झेलम नदीवरील किशनगंगा धरणाचे दरवाजे बंद करण्याचा सरकार विचार करत आहे.
हेही वाचा: पाकिस्तान थोबाडावर आपटला; संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाक एकाकी
चिनाब नदीचे पात्र कोरडे:
भारताने चिनाब नदीचे पाणी रोखल्यानंतर पाकिस्तानची चिंता वाढली आहे. याचा परिणाम पाकिस्तानच्या पंजाब प्रांतावर होईल आणि तेथील शेतकऱ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील.
पाणी अडल्यामुळे पाकिस्तान तोट्यात कसा?
1 - पाकिस्तानातील 80 टक्के लोक शेतीसाठी सिंधू नदी प्रणालीच्या पाण्यावर अवलंबून आहेत.
2 - सिंधू नदी प्रणालीच्या 93 टक्के पाण्याचा सिंचन आणि विजेसाठी प्रामुख्याने वापर होतो.
3 - पाकिस्तानमधील शेती आणि पर्यावरणावर याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे.
4 - पाकिस्तानमधील वीजनिर्मिती आणि उद्योगधंदे डगमगू लागणार आहेत.