नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील युद्धात मध्यस्थी केल्याच्या वक्तव्यावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यु-टर्न घेतला आहे. 'भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या युद्धात मी मध्यस्ती केलीच नाही', असे ट्रम्प यांनी विधान केले. तसेच, 'भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील युद्धात मी मध्यस्थी केली असं मुळीच म्हणणार नाही. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील वाद मिटवण्यासाठी मी त्यांची मदत केली होती', असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी यु-टर्न घेतला. 'आपण केलेल्या मध्यस्तीमुळेच भारत आणि पाकिस्तान यांनी युद्धविरामाची घोषणा केली', असं डोनाल्ड ट्रम्प सतत म्हणत होते. अशातच, ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर जोरदार चर्चा होत आहे.
कोणाच्याही मध्यस्थीची भारताला गरज नाही:
नुकताच, ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, 'डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल आदर आहे, पण कोणाच्याही मध्यस्तीची भारताला गरज नाही. आम्ही पाकिस्तानसोबत थेट चर्चा करण्यास तयार आहोत. मात्र त्याआधी पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबवाव्यात आणि पाकव्याप्त काश्मीर भारताला सोपवावा', असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले.