नवी दिल्ली: सोमवारी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जपानचे संरक्षण मंत्री जनरल नकातानी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. यादरम्यान, पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याबाबत जपानने भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल संरक्षण मंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या भेटीबद्दलची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक्सवर पोस्टही शेअर केली.
जपानच्या संरक्षण मंत्र्यांसोबतची भेट:
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत-जपान संरक्षण मंत्रीस्तरीय बैठकीला आपली उपस्थिती दिली. यादरम्यान, त्यांनी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर जपानकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, संरक्षण मंत्री जनरल नाकातानी सान यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय बैठकीत सध्याच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिस्थितीवर दोन्ही बाजूंनी चर्चा केली. त्यासोबतच, द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणखी वाढवण्याच्या मार्गांवरही चर्चा झाली.
जपान सरकारचे आभार:
भारत आणि जपान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, 'पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासोबत मजबूत एकता दाखवल्याबद्दल मी जपान सरकारचे मनःपूर्वक आभार मानतो. भारत आणि जपान संरक्षण संबंध आणखी मजबूत करण्यास तुमच्या प्रचंड योगदानाचे मी कौतुक करतो'.
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लिहिले की, 'नवी दिल्ली येथे जपानचे संरक्षण मंत्री जनरल नाकातानी सॅन यांना भेटल्यावर खूप आनंद झाला. भारत आणि जपानमध्ये एक विशेष, धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी आहे. तसेच, या बैठकीत आम्ही संरक्षण सहकार्य आणि प्रादेशिक सुरक्षेवर चर्चा केली. दोन्ही बाजूंनी कोणत्याही स्वरूपातील दहशतवादाचा निषेध केला आहे आणि सीमापार धोक्यांचा सामना करण्यासाठी सहकार्य आणि संयुक्त प्रयत्न वाढवण्याच्या गरजेवर भर दिला आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जपानचे संरक्षण मंत्री नाकातानी सॅन यांनी भारतासोबत एकता व्यक्त केली आणि भारताला पूर्णपणे पाठिंबा दिला'.