नवी दिल्ली: पहलगाम येथे हल्ला झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने क्षणाचाही विलंब न करता पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी केल्यामुळे पाकिस्तान हादरला आहे. अशातच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे, आता भारत कधीही पाकिस्तानवर हल्ला करण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे, पाकिस्ताननेही सीमेवर जमावबंदी सुरू केली आहे, तर दुसरीकडे, पाकिस्तानी नेते घाबरू लागले आहेत. बरळणाऱ्या पाकिस्तानी नेत्यांच्या या यादीत पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची कन्या आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांचे नाव जोडले गेले आहे. 'पाकिस्तानवर हल्ला करण्यापूर्वी दहावेळा विचार करा. आमच्याकडे अणुबॉम्ब आहे, अशी दर्पोक्तीच मरियम नवाज यांनी केली आहे. पाकिस्तानवर कोणीच हल्ला करू शकत नाही', असा दावाही त्यांनी केला आहे.
हेही वाचा: लॉरेन्स बिश्नोई गँगची पाकिस्तानला धमकी
माहितीनुसार, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची कन्या, पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज एका कार्यक्रमामध्ये म्हणाल्या की, 'सध्या भारत-पाकिस्तानच्या सीमेवर चिंतेचे वातावरण आहे. यामध्ये धोकादेखील आहे. मात्र, तुम्ही काळजी करू नका. अल्लाहने पाकिस्तानच्या सैन्याला बळ दिले आहे. पाक सैन्य प्रत्येक हल्ल्याचे सडेतोड उत्तर देऊ शकते. पाकिस्तानवर हल्ला करताना कोणताही दुश्मन दहा वेळा विचार करेल. याचं कारण म्हणजे अल्लाहच्या कृपेने पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहेत'.
मरियम नवाजांनी वडिलांचे कौतुक केले:
यादरम्यान, पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचं कौतुक करत म्हणाली की, 'पाकिस्तानला अण्वस्त्रधारी करण्यात माझे वडील नवाज शरीफ यांची ऐतिहासिक भूमिका आहे'.
मरियम नवाजांना फारूक अब्दुल्लांचे प्रत्युत्तर:
भारत सरकारचे माजी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री फारूक अब्दुल्ला यांनी मरियम नवाजांना प्रत्युत्तर देत म्हणाले की, 'तुमच्याकडे जेव्हा अणुबॉम्ब नव्हते ना? त्याच्याही आधीपासून आमच्याकडे अणुबॉम्ब आहे. त्यामुळे, अशा पोकळ धमक्या देणे बंद करा'.