नवी दिल्ली: 22 एप्रिल रोजी जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात प्रचंड रोष उसळला होता. या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले होते. दोन आठवड्यांपासून कठोर कारवाईची प्रतीक्षा करणाऱ्या भारतीय जनतेच्या भावनांना उत्तर देत भारतीय सैन्याने बुधवारी (6 मे) मध्यरात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांवर जोरदार एअर स्ट्राईक करत ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) यशस्वी केलं. ही कारवाई भारतीय लष्कर, वायुदल आणि नौदल यांच्या संयुक्त समन्वयातून पार पडली.
या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या ठिकाणांना न धक्का लावता केवळ अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर अचूक आणि नियोजित हल्ला करण्यात आला. बहावलपूर (2 ठिकाणं), मुझफ्फराबाद, कोटली, मुरीदके, गुलपूर, भिंबर, चक अमरू आणि सियालकोट या 9 ठिकाणांचा या मोहिमेत समावेश होता. विशेषतः बहावलपूर आणि कोटलीमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळांना या कारवाईत मोठा फटका बसला असून, तिथे दहशतवाद्यांचे मोकळे अड्डे पूर्णपणे नष्ट करण्यात आले आहेत. भारतीय वायुदलाच्या अचूक हल्ल्यांमुळे या परिसरात दहशतवादी हालचालींना मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा: पाकड्यांची टरकली, 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त; भारतीय सैन्याचं एअर स्ट्राईक, 'ऑपरेशन सिंदूर' सक्सेसफूल
या कारवाईमुळे भारताची दहशतवादविरोधी भूमिका आणखी ठाम झाली आहे.भारत आता केवळ निषेध करून थांबत नाही, तर शत्रूला त्यांच्या घरात घुसून धडा शिकवतो, हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने दाखवून दिलं आहे.