नवी दिल्ली: 22 जूनला झालेल्या पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने अखेर घेतला आहे. भारतीय सैन्याने 6 मे रोजी मध्यरात्री एक निर्णायक पाऊल उचलत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील 9 महत्त्वाच्या दहशतवादी तळांवर अत्यंत अचूक आणि नियोजित हवाई हल्ले केले. "ऑपरेशन सिंदूर" या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मोहिमेमध्ये वायूदल, नौदल आणि थलसेना यांनी एकत्रितपणे सहभाग घेतला. ही कारवाई रात्री 1.30 वाजता सुरू झाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः संपूर्ण मोहिमेवर बारकाईने नजर ठेवून होते. सर्व 9 टार्गेट्स पूर्णतः उद्ध्वस्त करण्यात भारतीय सैन्याला यश आलं.
या हल्ल्यात विविध ठिकाणी लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा मोठ्या प्रमाणावर खात्मा करण्यात आला आहे. बहावलपूरमध्ये 200 हून अधिक दहशतवादी एकत्र होते, तर मुरिदकेमध्ये 120 पेक्षा जास्त. मुजफ्फराबाद येथे 130 पर्यंत, कोटली आणि गुलपूरमध्ये अनुक्रमे 80 आणि 75 दहशतवादी असल्याची माहिती आहे. भिंबर, चाक अमरू, आणि सियालकोटमध्येही अनेक अतिरेकी होते अशी माहिती सांगितली जात आहे. ही सर्व ठिकाणं दहशतवादी संघटनांचे केंद्रस्थान होती आणि त्यांना लक्ष्य करत भारताने निर्णायक आक्रमण केलं.
या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून प्रतिक्रिया देण्यात आली. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतावर ‘भ्याड हल्ल्यांचे’ आरोप करत सोशल मीडियावर प्रतिक्रिया नोंदवली. त्यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानच्या भूमीवर झालेल्या हल्ल्यांना गंभीर पातळीवर प्रत्युत्तर दिलं जाईल. त्यांनी दावा केला की, पाकिस्तानचं सैन्य आणि जनता या संकटाच्या वेळी एकवटली असून कोणत्याही विरोधकाचा हेतू यशस्वी होऊ दिला जाणार नाही.
शाहबाज शरीफ यांनी पुढे सांगितलं की, पाकिस्तानला अशा प्रकारच्या युद्धजन्य परिस्थितींचा अनुभव असून, ते देशाच्या सुरक्षेसाठी शेवटपर्यंत लढतील. मात्र, भारताच्या या ऑपरेशनमधून स्पष्ट झालं की, दहशतवादाला थारा देणाऱ्यांविरुद्ध आता भारत अधिक कठोर आणि निर्णायक भूमिका घेत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने पुन्हा एकदा दाखवून दिलं की, देशाच्या सुरक्षिततेवर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही, आणि त्याचे उत्तर नेहमीच ठोस कृतीतून दिलं जाईल.
हेही वाचा: पाकड्यांची टरकली, 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त; भारतीय सैन्याचं एअर स्ट्राईक, 'ऑपरेशन सिंदूर' सक्सेसफूल
भारताकडून करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकचे 9 प्रमुख लक्ष्यस्थान:
1. बहावलपूर
जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय
आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किमी अंतरावर
2. मुरीदके
लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय
सीमेपासून 30 किमी अंतरावर
3. सवाई
लष्कर-ए-तोयबाचा तळ
सीमेपासून 30 किमी दूर
4. गुलपूर
दहशतवाद्यांचा मोठा तळ
ताबारेषेपासून 35 किमी अंतरावर
स्ट्राईकवेळी सुमारे 80 दहशतवादी उपस्थित
हेही वाचा: भारतीय सैन्याचं एअर स्ट्राईक, 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त; पंतप्रधान मोदी स्वत: मॉनिटर करत होते 'ऑपरेशन सिंदूर'
5. बिलाल
जैश-ए-मोहम्मदचे हवाई तळ
सीमेपासून 35 किमी अंतरावर
6. कोटली
नियंत्रण रेषेपासून 15 किमी अंतरावर
येथे अंदाजे 50 दहशतवादी उपस्थित होते
7. बरनाला
दहशतवाद्यांचा गड
सीमारेषेपासून 10 किमी अंतरावर
8. सरजाल
जैश-ए-मोहम्मदचा तळ
सीमेपासून 8 किमी अंतरावर
9. महमूना
हिजबुल मुजाहिदीनचे प्रशिक्षण केंद्र
सीमेपासून 15 किमी अंतरावर