बारामुल्ला: पहलगाममध्ये पर्यटकांवर भ्याड हल्ला झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच जम्मू-काश्मीरमधील बारामुल्लात दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. नियंत्रण रेषेवरून दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. मात्र सतर्क भारतीय जवानांनी तात्काळ कारवाई करत गोळीबार सुरू केला आणि हा प्रयत्न फसवून लावला. या कारवाईत 2 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचीही माहिती समोर येत आहे.
काल पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्या हल्ल्याची धग शांतही झालेली नसताना, आजच बारामुल्ला येथे पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न झाल्याने काश्मीर खोऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र भारतीय लष्कराने वेळेत कारवाई करत दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.