नवी दिल्ली: भारत-पाकिस्तान दरम्यानच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज संयुक्त राष्ट्रसंघाने एक महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. ही बैठक पाकिस्तानच्या विनंतीनंतर बोलावण्यात आली असून, दोन्ही देशांना आपापली भूमिका मांडण्याची संधी यात दिली जाणार आहे. या माध्यमातून द्विपक्षीय तणाव निवळावा, हा संयुक्त राष्ट्रसंघाचा उद्देश आहे.
संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनीयो गुतारेस यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी संवाद साधला आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी तीव्र निषेध केला असून, अशा हिंसक घटनांपासून दोन्ही देशांनी दूर राहावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघ भारत-पाकिस्तानमधील संघर्ष कमी करण्यासाठी मध्यस्थी करत आहे. या बैठकीत भारताने दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची गरज असल्याचं मत मांडलं आहे, तर पाकिस्ताननेही चर्चेच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करण्याची तयारी दर्शवलेली आहे.