1 thousand madrasas closed
Edited Image
नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. या हल्ल्यात 26 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्याची जबाबदारी सुरुवातीला द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) नावाच्या संघटनेने घेतली होती, जी लष्कर-ए-तैयबा (LeT) चे एक नवीन रूप असल्याचे मानले जाते, परंतु TRF ने नंतर ती नाकारली. हल्ल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्याला पूर्ण ऑपरेशनल स्वातंत्र्य दिले आहे. याचा अर्थ असा की आता सैन्य कोणत्याही राजकीय अडथळ्याशिवाय त्यांच्या रणनीतीनुसार काम करू शकते. यामुळे पाकिस्तानची चिंता आणखी वाढली आहे.
पीओकेमध्ये 1000 हून अधिक मदरसे बंद -
प्राप्त माहितीनुसार, पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये 1000 हून अधिक मदरसे गेल्या 10 दिवसांपासून बंद ठेवण्यात आले आहेत. स्थानिक धार्मिक बाबींचे प्रमुख हाफिज नझीर अहमद यांनी भारताकडून संभाव्य लष्करी हल्ल्याच्या भीतीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची पुष्टी केली. विभागातील एका सूत्राने सांगितले की, सीमेवरील तणाव आणि संभाव्य संघर्ष लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे. पाकिस्तानने मदरसे बंद करणे हे भारताच्या रोषाला घाबरल्याचे लक्षण मानलं जात आहे.
हेही वाचा - दहशतवाद पोसणाऱ्या पाकड्यांच्या आर्थिक नाड्या भारत आवळणार; सिंधू जलकरार स्थगितीनंतर 'हे' दोन हल्ले?
शालेय मुलांना देण्यात येत आहे प्रशिक्षण -
मुजफ्फराबादसह पीओकेच्या अनेक भागात आपत्कालीन सेवा हाय अलर्टवर आहेत. भारताच्या संभाव्य हल्ल्याच्या बाबतीत काय करावे? याचे प्रशिक्षण शालेय मुलांना दिले जात आहे. यावरून हे स्पष्ट होते की यावेळी पाकिस्तान भारताच्या प्रत्युत्तरामुळे खूप घाबरला आहे.
हेही वाचा - एनआयएच्या अहवालात नेमकं काय? पहलगाम हल्ल्यामागचं पाकिस्तानचं कारस्थान उघड
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी कराराची अंमलबजावणी थांबवली. तसेच पाकिस्तानी नागरिकांना भारतात येण्यास बंदी घातली. पाकिस्तानसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.