भाविकांना मंदिराच्या वतीने अन्नदान
पंढरपूर: अक्षय तृतीया म्हणजे अक्षय फलदायी दिवस. या दिवशी केलेले प्रत्येक पुण्यकर्म हजारपट वाढते, असं शास्त्रात सांगितलं जातं. यंदाची अक्षय तृतीया (2025) एक विशेष योग घेऊन आली असून, पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात याचे खास उत्सवमय वातावरण पाहायला मिळत आहे.
मंदिर समितीने या पवित्र दिवशी खास आमरस नैवेद्य विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या चरणी अर्पण केला. यासोबतच भाविकांसाठी दोन दिवस विशेष ‘आमरस भोजन’ सेवा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
हेही वाचा: Akshaya Tritiya 2025:अक्षय्य तृतीयेनिमित्त 'या' वस्तू दान करणं ठरेल फायदेशीर
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या परंपरेनुसार, अक्षय तृतीया ते वटपौर्णिमा या कालावधीत पंचपक्वान नैवेद्यात आमरसाचा समावेश करण्यात येतो. ही परंपरा केवळ नैवेद्यापुरती मर्यादित न राहता, भाविकांच्या सेवेतही ती उतरवली जाते. सध्या रोज सुमारे पाच हजार भाविकांना मंदिराच्या वतीने अन्नदान केले जाते.
यंदा अक्षय तृतीयेच्या दिवशी आणि त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी भाविकांसाठी आमरसासह पारंपरिक महाराष्ट्रीय जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.मंदिर प्रशासनाने यासाठी विशेष नियोजन केले असून, स्वच्छता, आरोग्य आणि शिस्तीचा योग्य समन्वय राखत भाविकांना सर्वोत्तम सेवा मिळावी, यासाठी यंत्रणा सज्ज आहे.