पैठण: पैठणमधील अब्दुल्लापूर तांडा येथील एका शेतकऱ्याची तब्बल 1 लाख 30 हजार रुपयांची बैलजोडी चोरी गेल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे अखेर या गुन्ह्याचा छडा लागला आहे. पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनंतर, पथकाने राजनगांव दांडगा येथील शेख नय्युम या संशयितास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने ज्ञानेश्वर हुमचंद राठोड (वय 27) याच्यासह मिळून बैलजोडी चोरी केल्याची कबुली दिली.
या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली बैलजोडीही जप्त करण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर गुन्ह्यात वापरलेले अशोक लिलॅन्ड कंपनीचे वाहनदेखील हस्तगत करण्यात आले असून त्याचा पंचनामा करण्यात आला आहे. एकूण 3 लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपींकडून अजूनही काही गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही टोळी फक्त बैलचोरीपुरती मर्यादित नसून, त्यांचा सहभाग इतर ठिकाणच्या चोरींमध्येही असण्याचा संशय आहे. यामुळे स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून, पोलिसांच्या पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.