Thursday, May 22, 2025 06:21:07 PM

दशावतार कलाकार राजाश्रयाच्या प्रतीक्षेत; आठशे वर्षांची परंपरा असलेले 'दशावतार'

कोकण म्हणजे जणू स्वर्गच. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, कोणताही ऋतू असो प्रत्येक ऋतुत मन प्रसन्न करून सोडणारे वातावरण या कोकणात असते.

दशावतार कलाकार राजाश्रयाच्या प्रतीक्षेत आठशे वर्षांची परंपरा असलेले दशावतार


सिंधुदुर्ग : कोकण म्हणजे जणू स्वर्गच. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, कोणताही ऋतू असो प्रत्येक ऋतुत मन प्रसन्न करून सोडणारे वातावरण या कोकणात असते. पावसाळा संपून हिवाळ्याची जसजशी चाहूल लागायला सुरुवात होते तेव्हा गावागावातील उत्सव आणि जत्रांचे वेध लागतात. मंदिरांतील जत्रा म्हणजे तळ कोकणाची वेगळी ओळख आहे. गावातील लोकांनी एकत्र यावे हा त्या मागचा उद्देश आहे अशा जत्रा आणि उत्सवांचे प्रमुख आकर्षण असते ते तिथे सादर होणारे दशावतार.

रंगलेल्या मुखवट्याक पोषाखाची साथ आसता 
चेहऱ्यावरचे हावभाव सांस्कृतिक जण आणता 
पेटयेच्या साथीक पखवाज आणि झंज आसता 
रात्रीचो चालनारो ह्यो दशावताराचो खेळ आसता 

कोकण आणि दशावतार हे वेगळंच समीकरण आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेली ही लोककला कोकणात अजूनही जपली गेली आहे. ती या कलाकारांमुळेच. गावातील जत्रा म्हणजे दशावतारी कलाकारांना आपली कला सादर करण्याचे हक्काचे स्थान होय.पूर्वी मोजक्याच दशावतारी कंपन्या असतं, त्या कंपन्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आता बऱ्याच नवीन कंपन्या चालू झाल्या आहेत. त्यामुळे आता दशावतार जास्त लोकाभिमुख होत चालला आहे.


हेही वाचा : 'जय श्रीराम'च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे 800 यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

दशावतार रंगमंचावर सुरू होण्याआधी रंगमंचामागे गणपती आणि कलाकारांच्या साहित्यांची आरती आणि पुजा केली जाते. रंगमंचावरील सादरीकरणाचे स्वरूप हे वर्षानुरूप चालत आलेल्या पद्धतीनेच केले जाते. आधी गणपतीस्तवन, मग पुर्वरंगात रिद्धी सिद्धी, भटजी, संकासूर, सरस्वती, ब्रम्हा, विष्णू यांचे प्रवेश आणि उत्तरार्धात रामायण, महाभारतामधील पौराणिक कथा दाखवली जाते. महत्वाचं म्हणजे दशावतारी नाटकांची लिखित संहिता नसते, स्वतःची रंगभूषा करायला सुरुवात करण्याच्या काही क्षण अगोदर कोणते कथानक करायचे हे कलाकारांना सांगितले जाते. त्यानुसार प्रत्येक पात्र स्वतःचे संवाद तयार करतात.

या कथानकातील रंगभूषा, वेशभूषा, अभिनय, संवादफेक, संगीत कथानक, युद्धनृत्य या सर्वांचे सादरीकरण आणि कलाकारांचे कौशल्य अनुभवण्यासाठी रसिक प्रेक्षक रात्रभर हे नाटक बघत असतात. ही नाटके रात्री 10-11 वाजता सुरू होऊन रंगत रंगत पहाटेपर्यंत चालू असतात. दशावतार म्हणजे विष्णूचे दहा अवतार. कर्नाटकातील यक्षगान परंपरेशी साधर्म्य असल्यामुळे याची पाळेमुळे दक्षिणेत रूजलेली असावित असे मानले जाते. 

दशावतारी नाट्याचा उल्लेख सतराव्या शतकातील संत रामदास लिखित दासबोधात देखील आढळून येतो. संत रामदास यांनी लिहिले आहे, ‘खेळता नेटके दशावतारी तेथे येति सुंदर नारी, नेत्र मोडिती कळाकुसरी परी अवघे धटिंगण’ आजही दशावतारी नाटकांमध्ये स्त्रिया काम करत नाहीत. स्त्रियांची भूमिका पुरूषच करतात. पुरूषांचे स्त्रीमध्ये होणारे रूपांतर पाहणे ही गावकर्‍यांसाठी मोठ्या उत्सुकतेची गोष्ट असते. दशावतारी नाटकामध्ये स्त्री भूमिका करणारे पुरुष कलाकार यांना विशेष महत्व असते. त्यासाठी खास कलाकार असतात. दशावतारात स्त्री भूमिकेसाठी नटी आणण्याचा प्रयोग पूर्वी केला गेला होता परंतु बऱ्याच धार्मिक, सामाजिक व इतर अडचणींमुळे तो प्रयोग यशस्वी होऊ शकला नाही.

मंडळाचा गणपतीचा पेटारा ही सर्वांत मोठी अमानत असते. हा गणपती नवसाला पावतो, अशी अनेक ग्रामस्थांची श्रद्धा असते. म्हणूनच नाट्यमंडळ गावात दाखल झालं आणि त्यांनी पेटारा आणला की ग्रामस्थही त्या गणपतीची आवर्जून पूजा करतात. जत्रांमधल्या नाटकांमध्ये या गणपतीची आरती केली जात नाही. पण व्यावसायिक स्वरूपात करावयाच्या नाटकांची सुरुवात गणपतीच्या आरतीने केली जाते. पेटार्‍यातील गणेशदर्शनाबरोबरच शस्त्रं, अस्त्रं दाखवायची पद्धतही पूर्वी होती. रात्रीचा राजा आणि सकाळी डोक्यावर बोजा.. अशी म्हण दशावतार नाटकात प्रचलित आहे. त्या काळात वाहतूक साधने यांची कमतरता, धुळीचे रस्ते, एसटीचा प्रवास तरीपण दशावतार नाटक प्रतिकूल परिस्थितीतही सादर केले जायचे तासनतास पायपीट करत हे कलाकार आपला बोजा म्हणजेच पेटी बॉक्स डोक्यावर घेऊन जिथे नाटक सादर करायचे आहे, तिथपर्यंत जातात आणि पुन्हा तशाच पद्धतीने नाटक आटोपल्यानंतर सकाळी परतीचा प्रवास करतात. त्यामुळे रात्रीचा राजा आणि सकाळी डोक्यावर बोजा ही म्हण दशावतारांना प्रचलित झाली. मात्र जसा काळ बदलत गेला तसा दशावतारातही मोठ्या प्रमाणात बदल होत गेले. आज दशावतार हे आपल्या टेम्पो ट्रॅव्हलर दशावतार सादर करण्याच्या स्थळापर्यंत येऊन पोहोचतात. दशावतार हा पूर्वीचा आणि आताचा यामध्ये ही मोठ्या प्रमाणात फरक जाणवतो. पूर्वी विष्णूची दहा रूपे यातून पौराणिक कथासार सादर केला जायचा मात्र आता सामाजिक कथासार सादर केला जातो. ट्रिक्स सीन यामधून दशावतार सादर होतो. मात्र नेपथ्य हे आजही दशावताराला म्हणजेच प्रत्येक कलाकाराला स्वतःच करावे लागते आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक कलाकार जे कथानक असेल ते कोणताही स्क्रिप्ट शिवाय उत्स्फूर्तपणे सादर करतात हेच दशावतार कलाकारांचे वेगळेपण आहे.

आठशे वर्षांची ही परंपरा आहे परंतु शासनाकडून उपेक्षित आहे. नाटकाचं नेपथ्य हे कलाकार स्वतःच करतात. दहा बाय दहाच्या सेटवरही अख्ख नाटक उभं करतात. यांची रंगभूषा, वेशभूषा, आकर्षक असते. इतकं असल तरी याना मिळणारं मानधन मात्र तुटपुंज असतं. त्यामुळे ही कला त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन नाही. त्यासाठी त्यांना वेगळा व्यवसाय नोकरी करावी लागते. मात्र मिळणाऱ्या मिळकतीतून स्वतःकडची पदरमोड करून हे कलाकार आपली कला जोपासतात. 

जसं कलाकाराचं वय वाढत जातं. तसं नाटकाचे प्रयोग करणं रात्रीच जागरण करणं जमत नाही. मात्र कलेची आवड आणि इच्छाशक्ती इतकी असते की चेहऱ्याला रंग लावल्याशिवायही करमत नाही. त्यामुळे शासन जे सध्या मानधन देत आहे. त्यात वाढ व्हावी अशी मागणी ज्येष्ठ कलावंत करताना पाहायला मिळतात. प्रत्येक विभागाची ओळख ही तिथली लोककला आणि लोककलाकारही असतात. हेच लोककलाकार आजही शासनाकडून राजाश्रयाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना राजाश्रय मिळून योग्य मानधन मिळावं आणि हे गाऱ्हाणं शासन दरबारी पोहोचावं यासाठी जय महाराष्ट्राचा हा छोटासा प्रयत्न आहे


सम्बन्धित सामग्री