मुंबई: अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांची माजी व्यवस्थापक दिशा सालियन यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी तिच्या वडिलांनी, म्हणजेच सतीश सालियन यांनी केलेल्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश बुधवारी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते.
बुधवारी न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर सतीश सालियन यांची याचिका सुनावणीसाठी आली होती. त्यावेळी या प्रकरणी अपघाती मृत्यू नोंद झाली होती. दिशा सालियन यांच्या मृत्यूप्रकरणात चौकशी झाल्यानंतर हा खटला बंद करण्यात आला होता. त्यामुळे, आता दिशाच्या कुटुंबाने याचिका दाखल केली आहे. यामुळे या सर्व पैलूंचा विचार करावा लागेल. म्हणून, 'या प्रकरणात आमची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे,' असे सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने त्यांचे म्हणणे मान्य केले आणि सरकारला सालियन यांच्या याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी वेळ दिला. यावेळी न्यायालयाने असेही स्पष्ट केले की, 'जर याचिकाकर्त्यांना तातडीने सुनावणी हवी असेल तर ते उच्च न्यायालयाच्या सुट्टीतील खंडपीठासमोर अपील करू शकतात'.
दिशा सालियनचा मृत्यू कसा झाला?
दरम्यान, अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांची माजी व्यवस्थापक दिशा सालियन यांचा 8 जून 2020 रोजी मालाड येथील एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली होती. दिशा सालियन यांच्या मृत्यूच्या काही दिवसानंतर, म्हणजेच 14 जून 2020 रोजी, अभिनेता सुशांत सिंग राजपूत वांद्रे येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला. सुरुवातीला पोलिसांनी सुशांतच्या आत्महत्येचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, 'सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आली आहे', असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. परंतु, जेव्हा हे प्रकरण खूप तापले, तेव्हा दिशाच्या कुटुंबीयांनी दिशाचा खून झाल्याचे आरोप फेटाळले. याबाबतीत, दिशाच्या कुटुंबीयांनी न्यायालयात तसे प्रतिज्ञापत्रही दाखल केले होते. मात्र, दिशाच्या वडिलांनी सध्या उच्च न्यायालयात धाव घेतली असून 'दिशाचा खून झाला आहे' असा दावा केला आहे. त्यासोबतच, या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
दरम्यान, दिशाचे वडील सतीश सालियन यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतर आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा: महाराष्ट्र दिनानिमित्त जाणून घ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं मोलाचं योगदान
पुराव्यांमध्ये अदलाबदली केल्याचा आरोप:
पुराव्यांमध्ये अदलाबदली केल्याबाबत दिशाचे वडील सतीश सालियन म्हणाले की, 'दिशावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता आणि त्यानंतर तिचा खून करण्यात आला. त्यानंतर, या प्रकरणात सहभागी असलेल्या काही प्रभावशाली लोकांना वाचवण्यासाठी हे प्रकरण दाबण्यात आल्याचा दावाही सालियन यांनी याचिकेत केला आहे. याचिकेत असा देखील आरोप करण्यात आला आहे की, दिशा आत्महत्या केली आहे किंवा तिचा मृत्यू अपघाती झाला आहे, याबाबतची माहिती न घेता मुंबई पोलिसांनी फॉरेन्सिक, परिस्थितीजन्य पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीचा विचार न करता घाईघाईने खटला बंद केला'.