Wednesday, May 14, 2025 11:47:47 PM

'आमचं आयुष्य संपत आलं आहे पण.......' किल्लारी येथील कामगारांचे आत्मदहन आंदोलन

किल्लारी साखर कारखान्याचे कामगार 18 वर्षांपासून थकीत वेतनासाठी लढत असून, न्याय न मिळाल्याने आता आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला आहे

आमचं आयुष्य संपत आलं आहे पण किल्लारी येथील कामगारांचे आत्मदहन आंदोलन

लातूर: औसा तालुक्यातील किल्लारी येथील शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कामगार मागील 18 वर्षांपासून थकीत वेतन व ग्रॅज्युएटीच्या रकमेसाठी संघर्ष करत आहेत. मात्र न्याय मिळत नसल्याने आता त्यांनी आत्मदहन आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर शेकडो कामगारांनी शासनाच्या उदासीनतेविरोधात जोरदार आंदोलन छेडले आहे.

सन 1972 मध्ये सुरू झालेल्या किल्लारीच्या शेतकरी सहकारी साखर कारखान्यात सुमारे 500 कामगार कार्यरत होते. मात्र 2007 मध्ये कारखाना अडचणीत आल्याच्या कारणावरून हे सर्व कामगार अचानक कामावरून कमी करण्यात आले. त्या वेळी कारखान्याने त्यांना थकीत वेतन, ग्रॅज्युएटी व इतर हक्काच्या रकमा वेळेत न देता प्रकरण लटकवत ठेवले.

यासंदर्भात अनेक वेळा प्रशासन दरबारी व स्थानिक राजकीय नेत्यांकडे मागणी केली गेली. मात्र प्रत्येक वेळी आश्वासनांचे पोकळ गोडवे मिळाले, पण प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. परिणामी कामगारांमध्ये संताप आणि असंतोष वाढत गेला.

हेही वाचा: नवनीत राणांचा जिल्हा रुग्णालयावर हल्लाबोल

आता या कामगारांनी मागील वर्षापासून आत्मदहन आंदोलन सुरू केले आहे. आमचं आयुष्य संपत आलं आहे, पण आम्हाला आमचं हक्काचं वेतन मिळालं नाही, अशा भावना आंदोलनकर्त्या कामगारांनी व्यक्त केल्या. काही ज्येष्ठ कामगार आजारी असून, आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. अनेकांच्या घरांमध्ये उपासमारीची वेळ आली आहे.

कामगार दिनी हे आंदोलन अधिक तीव्र झालं असून, किल्लारी परिसरात मोठ्या प्रमाणावर कामगारांनी एकत्र येत आत्मदहनाचा इशारा दिला. त्यांनी शासनाला ठोस निर्णय घेण्याची मागणी केली आहे. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आलो, पण आता आमच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. जर शासनाने त्वरित निर्णय घेतला नाही, तर प्रत्यक्ष आत्मदहन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही.

या आंदोलनामुळे प्रशासनासह राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून, आता पाहावे लागेल की शासन या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि कामगारांना न्याय देण्यासाठी काय पावले उचलते.
 


सम्बन्धित सामग्री