अमरावती: जिल्हा रुग्णालयातील अस्वच्छतेच्या मुद्द्यावरून माजी खासदार नवनीत राणा यांनी प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला आहे. रुग्णालयातील वॉर्ड, वॉशरूम्स आणि वैद्यकीय सेवा यांच्या दुरवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना थेट फोनवरून जाब विचारला. स्वच्छता करा नाहीतर मी तिथे येऊन धिंगाणा करेन, असा दम देखील दिला.
नवनीत राणा यांनी सांगितलं की, आज मी रुग्णालयातील काही फोटो पाहिले. वॉशरुम इतके अस्वच्छ आहेत की तिथे कोणताही रुग्ण किंवा त्याच्या नातेवाईकांना जाणं अशक्य आहे. शासन दरवर्षी लाखो रुपये स्वच्छता कंत्राटासाठी देते, तरीही तिथली अवस्था दयनीय आहे. हे कंत्राटदार काय काम करत आहेत?
अस्वच्छता इतकी गंभीर आहे की सामान्य नागरिकांना देखील तिथे जाणं शक्य नाही, असं त्यांनी नमूद केलं. “कोणी गरीब रुग्ण तिथे येतो आणि त्याला माणूस म्हणून ज्या सुविधा मिळायला हव्यात त्या जर नसतील, तर ही व्यवस्थाच फेल आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली.
हेही वाचा:जरांगेंच्या मागण्यांना कायद्याच्या चौकटीत राहून पूर्ण करा; पंकजा मुंडेंची मागणी
केवळ स्वच्छतेचा प्रश्नच नव्हे, तर रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीनदेखील बंद असल्याची तक्रार त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली. इतक्या मोठ्या जिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅनची सुविधा बंद असणं म्हणजे आरोग्य यंत्रणेचा अपमान आहे, असंही त्यांनी सांगितलं. त्यांनी प्रशासनाला तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली असून, यासंदर्भात कुठलीही हलगर्जी सहन केली जाणार नाही, असेही स्पष्ट केले.
जर पुढच्या काही दिवसांत परिस्थिती सुधारली नाही, तर मी स्वतः रुग्णालयात येऊन धिंगाणा करेन. हे मी स्पष्ट सांगते. गरिबांच्या हक्कासाठी मी कधीही लढायला तयार आहे, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. या प्रकारामुळे आरोग्य यंत्रणेतील हलगर्जीपणा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.
नवनीत राणा यांचा हा रोखठोक अंदाज आणि प्रशासनावरचा दबाव पाहता लवकरच रुग्णालयात सुधारणा होतील अशी अपेक्षा आहे. मात्र, यामध्ये केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर भर न देता दीर्घकालीन उपाय करणं गरजेचं आहे. जिल्हा रुग्णालयातील व्यवस्थापन, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा यावर नव्याने लक्ष केंद्रीत होण्याची शक्यता आहे.