पालघर: शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची तारेवरची कसरत करावी लागत आहे. पाण्याच्या प्रवाहातून विद्यार्थी शाळेपर्यंत प्रवास करत आहेत. पालघरच्या ग्रामीण भागातील हा प्रकार आहे.
देशाची एका बाजूला डिजिटल इंडियाकडे वाटचाल सुरू असताना दुसऱ्या बाजूला मात्र शिक्षण घेण्यासाठी पालघरच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात टाकून शिक्षणासाठी शाळेपर्यंत पोहचावं लागतं आहे. नदीवर पूल नसल्याने विक्रमगडच्या म्हसे गावातील विद्यार्थी पावसाळ्यात नदीतून वाहणाऱ्या धोकादायक पाण्याच्या प्रवाहातून चक्क टायरमधील रबराच्या ट्यूबवर नदी पार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. म्हसे गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी पिंजाळ नदी पार करून वाकी येथील शाळेत शिक्षणासाठी जातात.
हेही वाचा: Nagpur Crime: प्रेमाच्या जाळ्यात अडकवून कारमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार
उन्हाळ्यात या नदीत पाण्याचा प्रवाह कमी असल्याने हे विद्यार्थी सहजच नदी ओलांडत असले तरी पावसाळ्यात नदीतील वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात देखील आपल्या जीवाची पर्वा न करता हे विद्यार्थी टायरमधील ट्यूबच्या आधारावर जीवघेणा प्रवास करून आपलं शिक्षण पूर्ण करत आहेत. शिवाय नदी पार करताना रोज या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना देखील तारेवरची मोठी कसरत करावी लागते. तर या धोकादायक प्रवासामध्ये विद्यार्थ्यांसोबत काही दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.