नाशिक: नाशिकच्या गोदावरी नदीतील पाण्याच्या वापरावर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते राजेश पंडित यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. गोदावरी नदीतील पाणी अतिशय प्रदूषित झाल्याने, मानवी वापरासाठी विशेषतः पिण्यासाठी आणि स्नानासाठी ते वापरणे धोकादायक ठरू शकते, असा याचिकाकर्त्यांचा दावा आहे.
गोदावरी नदीला धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे. मात्र, दिवसेंदिवस वाढत्या प्रदूषणामुळे नदीचे पाणी अस्वच्छ आणि विषारी झाले आहे. याआधीही उच्च न्यायालयाने नदीच्या स्वच्छतेबाबत निर्देश दिले होते. परंतु, संबंधित शासकीय यंत्रणांनी त्या आदेशांचे पूर्ण पालन केलेले नाही, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
हेही वाचा: हिमाचल राजभवनातून पाकिस्तानचा झेंडा हटवला; 53 वर्षांनंतर ऐतिहासिक टेबलवरून स्मारक हटवले
याचिकेत पुढे म्हटले आहे की, काही वर्षांपूर्वी न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे तात्काळ व प्रभावी पालन व्हावे यासाठी सर्व शासकीय यंत्रणांना एक विशिष्ट कालमर्यादा ठरवून द्यावी. यासोबतच, प्रत्येक महिन्याला न्यायालयात पाण्याच्या गुणवत्ता अहवाल सादर करण्याचे आदेश द्यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे. तसेच, या संपूर्ण अंमलबजावणी प्रक्रियेवर न्यायालयाच्या देखरेखीखाली काटेकोरपणे नियंत्रण ठेवावे, असेही याचिकेत नमूद आहे.
राजेश पंडित यांनी याचिकेमध्ये स्पष्ट मागणी केली आहे की, जोपर्यंत गोदावरी नदीतील पाणी स्वच्छ होत नाही आणि न्यायालयाचे आदेश प्रभावीपणे राबवले जात नाहीत, तोपर्यंत नदीच्या पाण्याच्या वापरावर पूर्णतः बंदी घालावी. ही बंदी फक्त पिणे किंवा स्नानासाठीच नव्हे, तर कोणत्याही मानवी वापरासाठी लागू असावी, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
याचिकेत आगामी कुंभमेळ्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. जर कुंभमेळ्याच्या आधी गोदावरीचे पाणी स्वच्छ झाले नाही, तर कुंभमेळ्यात स्नानावरही बंदी घालावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. गोदावरीत स्नान धार्मिकदृष्ट्या पवित्र मानले जाते, मात्र प्रदूषित पाण्यात स्नान केल्याने आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असे सामाजिक कार्यकर्ते राजेश पंडित यांचे म्हणणे आहे.