छत्रपती संभाजीनगर: सध्या, भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती शिगेला पोहोचली आहे आणि ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने पाकिस्तानवर केलेल्या प्रत्युत्तराचे पडसाद वेरूळमध्ये उमटले आहेत. जगप्रसिद्ध वेरूळ लेणी आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री घृष्णेश्वर मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे.
मंदिर परिसरात येणाऱ्या प्रत्येक भाविकांची कठोर तपासणी केली जात आहे. ही तपासणी अजिंठा प्रायव्हेट लिमिटेडच्या सुरक्षा रक्षकांकडून केली जात आहे. मंदिरात कोणतेही साहित्य नेण्यास मनाई आहे. तपासणी केल्यानंतरच मोबाईल फोन, कॅमेरे आणि बॅगा आत नेण्याची परवानगी आहे. यासोबतच, सीसीटीव्हीद्वारेही कडक देखरेख ठेवली जात आहे.
पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जगप्रसिद्ध वेरूळ गुहेतील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून ती कडक करण्यात आली आहे. गुहेच्या परिसरात रॅपिड अॅक्शन फोर्सची तुकडी तैनात करण्यात आली आहे. यादरम्यान, शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथील ग्रामीण पोलिस अधीक्षक इशू सिधू यांनी वेरूळ लेणीला भेट देऊन तेथील सुरक्षेचा आढावा घेतला. यावेळी पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे देखील उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची विशेष काळजी:
दहशतवाद्यांना रोखण्यासाठी तसेच पर्यटक व भाविकांच्या सुरक्षिततेसाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिस विशेष काळजी घेत आहेत. तसेच, जगप्रसिद्ध असलेले वेरूळ लेणी, बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिर, भद्रा मारुती मंदिर, औरंगजेब कबर, जरजरी बक्ष दर्गाह, म्हैसमाळ गिरीजादेवी मंदिर, दूरदर्शन संचप्रक्षेपण केंद्र या ठिकाणी पर्यटक व भाविकांची गर्दी पाहता या पवित्र स्थळांवरील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पर्यटक आणि भाविकांच्या वाढत्या गर्दीला लक्षात घेता पोलिस यंत्रणा सुरक्षिततेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करण्यास तयार नाही. डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर, सीसीटीव्ही कॅमेरे बसवून फुटेजच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
हेही वाचा: भारत-पाक युद्धाशी आमचा संबंध नाही; अमेरिकेचे उपराष्ट्रध्यक्ष जे.डी.व्हान्स यांचं वक्तव्य
तीन दहशतवाद्यांसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त:
9 मे 2006 रोजी, वेरूळ लेण्यांमधील 12 व्या ज्योतिर्लिंगपैकी एक असलेल्या घृष्णेश्वर मंदिराजवळ तीन दहशतवाद्यांकडून शस्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. त्यांच्याकडून 10 एके-47 रायफल, 40 मॅगझिन, 2000 जिवंत काडतुसे आणि 30 किलो आरडीएक्स जप्त करण्यात आले होते. याबाबतची माहिती राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली होती.