मुंबई : ठाकरे गटाचा आज निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्याला उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले. विरोधकांची दांडी उडवायची आहे. भाजपा हिंदुत्त्ववादी हे फेक नरेटिव्ह तयार करत असल्याची टीका त्यांनी भाजपावर केली आहे.
घाटकोपरची भाषा गुजराती असल्याचे जोशी यांनी म्हटले होते. तसेच मुंबईत येणाऱ्याला मराठी शिकलं पाहिजे असं नाही असे भैय्याजी जोशी यांनी म्हटले होते. यामुळे घाटकोपरमध्ये अनाजीपंत बडबडून गेले असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपासह भैय्याजी जोशींवर हल्लाबोल केला.
हेही वाचा : कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची राज ठाकरेंनी उडवली खिल्ली
'मी महाराष्ट्रात मराठी आणि देशात हिंदू'
भाजपा दैवतावरून भांडणं लावत आहे. तुम्ही हिंदुत्व नासवून टाकत आहात. बांगलादेश, पाकशी क्रिकेट खेळणाऱ्यांनी हिंदुत्व शिकवू नये अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपावर केली आहे. मी महाराष्ट्रात मराठी आणि देशात हिंदू आहे अशी भूमिका ठाकरेंनी व्यक्त केली आहे.
'माझा जीव 'वर्षा'वर नाही तर शिवसैनिकांमध्ये अडकला आहे'
महाराष्ट्राची अस्मिता तुडवली जात आहे. मुंबईचं महत्त्व कमी केलं जातं आहे. अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवसेनेच्या मुळापर्यंत कोणीही पोहोचणार नाही. माझा जीव 'वर्षा'वर नाही तर शिवसैनिकांमध्ये अडकला आहे. संजय राऊतांना घाबरून तुरुंगातून सोडलं अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
'कोस्टल रोडचं कर्तृत्व फडणवीसांचं नव्हे शिवसेनेचं'
कोस्टल रोडचं कर्तृत्व फडणवीसांचं नव्हे शिवसेनेचं असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना चिमटा काढला आहे. त्याचबरोबर मुंबईत अनेक विकासकामं केली असे उद्धव यांनी म्हटले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाविषयी बोलताना मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता घ्या असे म्हणत एकप्रकारचे उद्धव ठाकरे यांनी सरकारला आव्हान केले आहे. मराठी माणसाने एकजूट बांधावी असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.