यवतमाळ: यवतमाळ जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने देशात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे निर्देश दिले होते . या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यात 14 पाकिस्तानी आणि 1 बांगलादेशी नागरिक वास्तव्य करत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून, यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
व्हिसा मुदतवाढीसाठी अर्ज केलेले नागरिक
हे सर्व पाकिस्तानी नागरिक भारतात ‘टुरिस्ट व्हिसा’वर आले आहेत. विशेष बाब म्हणजे, यामधील कोणाकडेही ‘सार्क व्हिसा’ नसून त्यांच्यापैकी 12 नागरिकांनी व्हिसा मुदतवाढीसाठी अधिकृतपणे अर्ज सादर केला आहे. उर्वरित दोन नागरिकांच्या व्हिसाची वैधता संपलेली आहे की नाही, याची तपासणी सुरू आहे. हे नागरिक मुख्यतः यवतमाळ शहर, पांढरकवडा आणि घाटंजी या भागात वास्तव्यास आहेत. पोलिस तपासात हेही उघड झाले आहे की, त्यापैकी काहीजण येथे लहान-मोठ्या व्यवसायांत गुंतलेले आहेत.
धर्मीय पृष्ठभूमी व नागरिकांचे मिश्र स्वरूप
या 15 विदेशी नागरिकांपैकी 10 जण हिंदू तर 4 जण मुस्लिम असून 1 नागरिक बांगलादेशचा आहे. हे नागरिक गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक नागरिकांमध्ये मिसळून राहत असल्याने त्यांचा शोध घेणे पोलिसांसाठी आव्हान ठरत आहे. त्यामुळे त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी गुप्तचर यंत्रणांची मदत घेतली जात आहे.
हेही वाचा:पंजाब सरकार देणार पाकिस्तानला सडेतोड उत्तर; सीमावर्ती भागात अँटी-ड्रोन सिस्टीम तैनात
कागदपत्रांची कसून तपासणी
या सर्व विदेशी नागरिकांच्या कागदपत्रांची व व्हिसाची वैधता तपासण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. यामध्ये त्यांचा भारतात येण्याचा उद्देश, वास्तव्याचा कालावधी, राहण्याचे ठिकाण आणि स्थानिक संपर्क याबाबत सखोल चौकशी केली जात आहे. पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या आदेशानुसार विदेशी नागरिकांविरोधात कारवाईसाठी आवश्यक ती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कोणताही कायदा मोडणारा किंवा संशयित नागरिक आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
शहरातील नागरिकांमध्ये चिंता
या घटनेनंतर शहरात काही प्रमाणात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला जात असून, प्रशासनाकडूनही नागरिकांना शांतता व संयम बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पोलिस प्रशासनाकडून सतत पेट्रोलिंग, सीसीटीव्ही तपासणी आणि गुप्त माहिती संकलन सुरू आहे.
यवतमाळसारख्या जिल्ह्यात पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांचा वावर उघडकीस येणं ही गंभीर बाब मानली जात आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने यावर त्वरित आणि कठोर पावलं उचलणं आवश्यक आहे. सध्या तरी परिस्थिती नियंत्रणात असून, पोलिस यंत्रणा सज्ज आहे.