मुंबई: मुंबईकरांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर आज आणि उद्या म्हणजेच 11 एप्रिल (शुक्रवार) आणि 12 एप्रिल (शनिवार) रात्री मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे तब्बल 344 लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागणार आहे.
पश्चिम रेल्वेवरील माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान मिठी नदीवरील पुलाचे पुनर्बांधणीचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी ब्रिज क्र. 20 चे गर्डर बदलण्यासाठीचे काम केले जाणार असून, त्यासाठी 9.30 तासांचा नाईट ब्लॉक घोषित करण्यात आला.
या मेगाब्लॉकदरम्यान केवळ लोकलच नव्हे, तर लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले आहेत. शुक्रवारी रात्री 10.23 नंतर मुंबई सेंट्रल ते सांताक्रुझदरम्यान सर्व लोकल जलद मार्गावरून धावायला सुरुवात झाली असून, चर्चगेटहून विरारकडे जाणारी शेवटची लोकल शनिवार रात्री 10.53 वाजता सुटेल.
मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात लोकल ट्रेन ही लाइफलाईन मानली जाते. अशा वेळी मोठ्या संख्येने लोकल रद्द होणं म्हणजे नक्कीच एक मोठं आव्हान आहे. प्रवाशांनी संयम ठेवून योग्य नियोजन करून प्रवास करावा, हाच सल्ला रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आला आहे.