Tuesday, May 20, 2025 04:09:18 PM

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून हात झटकले

कोल्हापूर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नागरी स्वागत आणि शेतकरी मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, पत्रकारांनी त्यांना कर्जमाफीबद्दल थेट प्रश्न विचारल्यावर अजित पवार म्हणाले.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून हात झटकले

कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने राज्यातील जनतेला अनेक मोठ्या घोषणा दिल्या होत्या. त्यापैकी सर्वात मोठे आश्वासन शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे होते. निवडणूक प्रचारादरम्यान आणि जाहीरनाम्यात महायुतीने ठामपणे सांगितले होते की ही कर्जमाफी निश्चित होईल. मात्र, निवडणुका झाल्यानंतर आणि महायुती सत्तेत आल्यानंतरही, कर्जमाफीचा मुद्दा अजूनही धूळखात पडलेला दिसत आहे. यामुळे, राज्यातील बळीराजा नाराज झाला असून विरोधकांनी यावर सरकारवर टीका केली आहे.

हेही वाचा: पंकजा मुंडेंना अश्लील मेसेज पाठवणाऱ्याला अटक

काही महाठगांनी चुना लावला त्यामुळे मी बोललो:

शुक्रवारी, कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यातील अडकूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नागरी स्वागत आणि शेतकरी मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान, पत्रकारांनी त्यांना कर्जमाफीबद्दल थेट प्रश्न विचारल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार थोडे अस्वस्थ दिसले आणि म्हणाले, 'मी वचन दिले होते का?' कर्जमाफीच्या मुद्द्यावर उत्तर म्हणून त्यांनी हात झटकत उत्तर दिलं. यामुळे उपस्थितांमध्ये गोंधळ उडाला. यानंतर, शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले की, 'पीक विम्यामध्ये काही लोकांनी फसवणूक केली होती. म्हणून मी असं म्हणालो की त्यांनी चुना लावला होता. मात्र, हे विधान शेतकऱ्यांबाबत अजिबात नव्हतं. मी सुद्धा एक शेतकरी आहे. त्यामुळे, बळीराजाविरोधात बोलणं अशक्य आहे', असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

खोटी गोष्ट पसरवण्यात विरोधक आघाडीवर:

विरोधकांवर टीका करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जातनिहाय जनगणनेच्या मागणीवरून काँग्रेसला लक्ष्य करत म्हणाले की, 'विरोधी पक्ष खोटे आरोप करत आहेत. काँग्रेस इतकी वर्षे सत्तेत असताना त्यांनी जातीनिहाय जनगणना का केली नाही?', असा प्रश्न देखील यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उपस्थित केला. त्यासोबतच, ते म्हणाले की, 'रायगडला पालकमंत्री न दिल्यावाचून काही अडलं का?', असं म्हणत त्यांनी त्यांच्या विरोधकांचे आरोप फेटाळले.

अजित पवारांनी कोल्हापुरी फेटा बांधण्यास दिला नकार:

या शेतकरी मेळाव्यादरम्यान, एक वेगळाच प्रसंग घडल्याचे पाहायला मिळाले. जेव्हा माजी आमदार राजेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोल्हापुरी फेटा घालून त्यांचा सत्कार करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांनी कोल्हापुरी फेटा बांधण्यास नकार दिला. त्यामुळे, माजी आमदार राजेश पाटील भावुक झाले. यावर स्पष्टीकरण देत अजित पवार म्हणाले की, 'राजेश पाटील हा माझा उजवा हात आहे. जोपर्यंत तो निवडून येत नाही, तोपर्यंत मी कोल्हापुरी फेटा घालणार नाही. जेव्हा ते निवडून येतील तेव्हा मी नक्कीच कोल्हापुरी फेटा घालेल'.


सम्बन्धित सामग्री