मुंबई: 19 जुलै 2025 रोजी 'सामना' वृत्तपत्राच्या पहिल्या मुलाखतीचा व्हिडिओ प्रदर्शित झाला. 'सामना'चे कार्यकारी संपादक आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली आहेत. यादरम्यान, जेव्हा खासदार संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारले की, 'दाढीवाले मिंधे म्हणतात, मी फक्त अर्ध्या दाढीवरून हात फिरवला. पूर्ण दाढीवरून हात फिरवला तर काय होईल? अर्ध्या दाढीत इतकी ताकद कोणी निर्माण केली?' यावर उद्धव ठाकरेंनी ठाकरे शैलीत उत्तर दिले.
हेही वाचा: मैंने राज ठाकरे को हिंदी सिखा दी; दुबेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं
'अर्धी दाढी राहिली हे नशीब' - उद्धव ठाकरे
काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंवर टीका केली होती की, 'मी केवळ अर्ध्या दाढीवरून हात फिरवला तर आडवे झाले'. यावर, उद्धव ठाकरे म्हणाले की, 'त्यांची अर्धी दाढी राहिली हे नशीब. त्यांनी जास्त बोलू नये, नाहीतर लोक त्यांची बिनपाण्याने करतील. राहिलेली अर्धी दाढीही काढतील. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, तिथे दाढीचा उपयोग का करत नाही?'.
हेही वाचा: मोठी अपडेट; उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या निवासस्थानी
'ठाकरे ब्रँड लोकांनी स्वीकारला' - उद्धव ठाकरे
मुलाखतीदरम्यान, उद्धव ठाकरे म्हणाले की, 'ठाकरे ब्रँड लोकांनी स्वीकारलेला आहे, तो आम्ही बनवलेला नाही. ठाकरे प्रामाणिक आहेत. लोकांसाठी लढणारे, जनतेच्या व्यथा-वेदनांना निर्भीडपणे वाचा फोडणारे आहेत. म्हणून महाराष्ट्रातील जनता इतकी वर्षे आमच्या सोबत राहिली आहे. माझ्या आजोबांपासून आणि शिवसेनाप्रमुखांपासून हे नातं घट्ट आहे. आता मी काम करत आहे. आदित्य आणि आता सोबत राज आलेला आहे. ठाकरे म्हणजे सदासर्वदा संघर्ष आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही'.