आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील सर्व लोकांसाठी एक इशारा जारी केला आहे. रिझर्व्ह बँक लोकांना एक मजकूर संदेश पाठवत असून यात बँकेने लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. ही सूचना विशेषतः व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की, देशात सायबर फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. केंद्र सरकारसोबतच, सर्व राज्य सरकारे देखील सायबर फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी त्यांच्या क्षमतेनुसार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
काय आहे रिझर्व्ह बँकेने दिलेला इशारा?
सायबर गुन्हे करणारे गुन्हेगार सतत नवीन मार्गांनी लोकांची फसवणूक करत असतात. या संदर्भात, डिजिटल अटकेची अनेक प्रकरणे देखील उघडकीस येत आहेत. रिझर्व्ह बँकेने लोकांना इशारा दिला आहे, डिजिटल अटकेपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. रिझर्व्ह बँकेने आपल्या संदेशात लिहिले आहे की, 'तुम्हाला डिजिटल अटकेची धमकी दिली जात आहे का? कायद्यात डिजिटल अटक असे काही नाही. वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती शेअर करू नका किंवा पैसे देऊ नका. मदतीसाठी 1930 वर कॉल करा.
हेही वाचा - 2032 मध्ये पृथ्वीवर मोठा विनाश होणार! नासाच्या शास्त्रज्ञांचा इशारा
डिजिटल अटक म्हणजे काय?
गुन्हेगार व्हॉट्सअॅपवर लोकांना व्हिडिओ कॉल करत आहेत आणि त्यांना डिजिटल पद्धतीने अटक करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळत आहेत. डिजिटल अटकेसारख्या गुन्ह्यांमुळे लोकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच काही लोकांना घाबरून आपले प्राणही गमवावे लागले आहेत.
हेही वाचा - Infosys ने 'हे' कारण देत शेकडो कर्मचाऱ्यांना दिला नारळ!
दरम्यान, आरबीआयने आपल्या इशाऱ्यात नमूद केलं आहे की, भारतीय कायद्यात डिजिटल अटक असे काही नाही. जर कोणी तुम्हाला व्हॉट्सअॅप किंवा इतर कोणत्याही व्हिडिओ कॉल अॅप्लिकेशनवर कॉल करत असेल आणि तुम्हाला डिजिटली अटक करण्याची धमकी देत असेल, तर प्रथम कॉल डिस्कनेक्ट करा आणि सायबर क्राइम सेंट्रल हेल्पलाइन क्रमांक 1930 वर कॉल करा आणि त्यासंदर्भा तक्रार करा.