Wednesday, May 21, 2025 01:58:04 PM

भारत-पाकिस्तानातील तणाव शिगेला; शस्त्रास्त्र निर्मिती केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द

भारत-पाक तणाव वाढल्याने MIL कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द; युद्धसज्जतेसाठी तातडीचा निर्णय. शस्त्रनिर्मिती सुरळीत राहावी यासाठी सरकारची महत्त्वाची पावले.

भारत-पाकिस्तानातील तणाव शिगेला शस्त्रास्त्र निर्मिती केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव आता अधिक गंभीर वळणावर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले असून देशातील शस्त्रास्त्र निर्मिती करणाऱ्या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आल्या आहेत.

म्युनिशन्स इंडिया लिमिटेड (MIL) ही भारत सरकारच्या अधिपत्याखालील संस्था असून, तिने याबाबत तातडीचा निर्णय घेतला आहे. देशातील सुरक्षेचा विचार करता युद्धसज्जतेची तयारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. या निर्णयाची पुष्टी भद्रावती येथील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केली असून त्यांनी सांगितले की, सध्या परिस्थिती अतिशय संवेदनशील असून प्रत्येक क्षणी तयार राहणे आवश्यक आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आल्या आहेत.

म्युनिशन्स इंडिया लिमिटेड ही संस्था देशाच्या संरक्षण क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावते. बंदुका, तोफा, दारुगोळा यासारख्या लष्करी शस्त्रास्त्रांची निर्मिती ही मुख्य जबाबदारी या संस्थेवर आहे. जर युद्धजन्य परिस्थिती उद्भवली, तर शस्त्रांचा पुरवठा सुरळीत ठेवणे ही प्राथमिक गरज असते. त्यामुळेच कर्मचाऱ्यांना त्वरित हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भारत-पाकिस्तान व्यापार संबंध; मर्यादित व्यवहार, वाढते तणाव

युद्धजन्य स्थिती उद्भवण्याच्या शक्यतेमुळे फक्त भद्रावती नव्हे, तर अन्य शस्त्रास्त्र निर्मिती केंद्रांमध्येही हा निर्णय लागू करण्यात आला आहे. नाशिक, कानपूर, तामिळनाडू, पुणे आदी ठिकाणच्या केंद्रांमध्येही कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या सरकारकडून कुठलीही अधिकृत युद्धसज्जतेची घोषणा झाली नसली, तरी प्रत्येक शक्यता गृहीत धरून तयारी सुरू आहे.

हा निर्णय घेत असताना कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावणेही गरजेचे असल्यामुळे वरिष्ठ अधिकारी आणि व्यवस्थापनामार्फत सतत संवाद साधला जात आहे. तातडीच्या सेवा म्हणून काही कर्मचाऱ्यांना विशिष्ट ड्युटीवर ठेवण्यात आले असून अतिरिक्त वेळेतही उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून भारत-पाकिस्तान सीमेवर तणावाचे वातावरण आहे. सीमा ओलांडून होणाऱ्या घुसखोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे भारतीय लष्कर सतर्क झाले असून सीमा भागात तैनात करण्यात आलेल्या दलांनी हालचालींना गती दिली आहे.

सरकारने घेतलेला हा निर्णय एक सुरक्षात्मक पाऊल असून नागरिकांनी घाबरून न जाता परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सरकार आणि लष्कर दोघेही सज्ज असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यास सक्षम असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.


सम्बन्धित सामग्री