नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सीमेलगतच्या राज्यांमध्ये हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-कश्मीरमध्ये केलेल्या हवाई कारवाईनंतर सुरक्षेचा उपाय म्हणून राजस्थान आणि पंजाबमध्ये विशेष सुरक्षा उपाययोजना राबवण्यात येत आहेत. या राज्यांतील सीमावर्ती भागात सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राजस्थानची 1,037 किमी लांबीची सीमा पाकिस्तानला लागून असल्याने राज्य प्रशासनाने तातडीची पावले उचलली आहेत. संपूर्ण सीमा सील करण्यात आली आहे आणि सीमा सुरक्षा दलाला कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास थेट गोळीबार करण्याचे ‘शूट अॅट साइट’ आदेश देण्यात आले आहेत. याचबरोबर, आकाशात भारतीय लढाऊ विमाने सतत गस्त घालत आहेत. विशेषतः सुखोई-30 एमकेआय जेट्स गंगानगर ते कच्छच्या रणापर्यंत हवाई गस्त करत आहेत.
हेही वाचा: शाहीन-3 विरुद्ध S-400; भारताची हवाई सुरक्षा सज्ज, दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर
जोधपूर, किशनगढ आणि बिकानेर येथील विमानतळ 8 मेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. याशिवाय, जैसलमेर आणि जोधपूरसाठी मध्यरात्री ते पहाटे चार वाजेपर्यंत ब्लॅकआउटचे आदेश देण्यात आले आहेत. ब्लॅकआउटमुळे आकाशातील हालचाली कमी दिसतात, जे शत्रूच्या लढाऊ विमानांना अडथळा ठरते. मिसाईल संरक्षण प्रणाली देखील सक्रिय करण्यात आली आहे, तर सीमाजवळील ड्रोनविरोधी यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
बिकानेर, श्री गंगानगर, जैसलमेर आणि बारमेर जिल्ह्यांतील शाळा तात्पुरत्या बंद करण्यात आल्या असून चालू असलेल्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पोलिस आणि रेल्वे विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून त्यांना तातडीने सेवेत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास सीमावर्ती गावांतील नागरिकांचे स्थलांतर करण्याचीही तयारी करण्यात आली आहे.
पंजाबमध्येही अशीच स्थिती असून राज्यात सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सर्व शासकीय कार्यक्रम तात्काळ रद्द केले आहेत. पोलिस विभाग पूर्ण सज्ज असून नागरिकांना अफवांपासून दूर राहण्याचे आणि अधिकृत माहितीसोबतच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सीमेवरील या तणावपूर्ण वातावरणामुळे देशात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. केंद्र सरकार आणि संरक्षण मंत्रालय या संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.