Thursday, May 22, 2025 06:38:47 PM

भारताच्या दबदब्याने पाकड्यांची घाबरगुंडी; युद्धाच्या भीतीने मध्यरात्री पत्रकार परिषद

भारताच्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ; मध्यरात्री पत्रकार परिषद घेऊन भारतावर आरोप.

भारताच्या दबदब्याने पाकड्यांची घाबरगुंडी युद्धाच्या भीतीने मध्यरात्री पत्रकार परिषद

नवी दिल्ली:  भारताने आपले इशारे अधिक तीव्र करताच पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. भारताकडून 24 ते 26 तासांच्या आत कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येताच, पाकिस्तान सरकारने मध्यरात्री 2 वाजता पत्रकार परिषद घेतली. पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी या पत्रकार परिषदेत भारतावर थेट आरोप करत आक्रमक भूमिका घेतली.

पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून वातावरण तणावपूर्ण आहे. भारत-पाक दरम्यान वाढत चाललेला संघर्ष, सीमारेषेवरील हालचाली आणि दहशतवादविरोधी कारवाया या पार्श्वभूमीवर भारताने केलेल्या इशाऱ्याने पाकिस्तानमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. अत्ताउल्लाह तरार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, भारत येत्या 24 ते 36 तासांत पाकिस्तानविरोधात मोठी लष्करी कारवाई करू शकतो. आम्ही सज्ज आहोत, मात्र युद्ध हे कोणाच्याही हिताचे नाही.

हेही वाचा:महात्मा फुले आणि पंतप्रधान जनआरोग्य योजनेतील गैरप्रकार; नागपुरातील 25 रुग्णालयांना नोटीस

भारताच्या कारवाईबाबत केलेल्या या दाव्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही खळबळ उडाली आहे. पाकिस्तान अशा प्रकारची माहिती देऊन जागतिक सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, पाकिस्तानच्या सरकारने रात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेणे हेच दर्शवते की, त्यांना भारताकडून होणाऱ्या संभाव्य कारवाईची भीती वाटू लागली आहे.

भारतानं अलीकडेच केलेल्या दहशतवादी ठिकाणांवरील कारवाया आणि लष्करी रणनीतीमुळे पाकिस्तानची गोची झाली आहे. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या धोरणात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, हे वारंवार स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील राजकीय आणि लष्करी नेतृत्व सतत दबावाखाली आहे.

या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. सीमावर्ती भागात लष्कराची सतर्कता वाढवण्यात आली असून जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सोशल मीडियावर देखील या पत्रकार परिषदेची चर्चा सुरू असून, नागरिकांनी युद्ध नको, संवाद हवा असा सूर लावलेला आहे.

भारत सरकारकडून या पत्रकार परिषदेवर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी,  भारत कोणतेही संभाव्य धोके टाळण्यासाठी सज्ज आहे.

पाकिस्तानच्या माहिती मंत्र्याचा हा आक्रमक दावा आणि मध्यरात्रीची पत्रकार परिषद या घडामोडी भारतावर दबाव आणण्याचा एक प्रयत्न असू शकतो. मात्र भारताच्या ठाम भूमिकेमुळे आणि प्रबळ नेतृत्वामुळे अशा कोणत्याही दबावाला झुकण्याची शक्यता नाही. देशाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत भारत कोणतीही तडजोड करणार नाही, हे पुन्हा स्पष्ट झाले आहे.


सम्बन्धित सामग्री