नवी दिल्ली: काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तिथे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या एकदमच रोडावली आहे. शिवाय, सरकारनेही आता तेथील 48 ठिकाणांचे पर्यटन तात्पुरत्या काळासाठी बंद केले आहे. काश्मीरमधल्या पर्यटनाच्या ऐन हंगामात ही परिस्थिती झाल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला आहे आणि काश्मीरमधल्या व्यावसायिकांच्या हाताचं कामच निघून गेलं आहे. यामुळे तिथलं अर्थकारण ठप्प झालं आहे. पण यामुळे हेच पर्यटक लेह, लडाख, सियाचीन आणि गलवानच्या दिशेने वळले आहेत आणि तिथे पर्यटनासाठी जाण्याचा विचार करू लागले आहेत.
सरकारही आता लेह-लडाखमध्ये पर्यटनाला चालना देईल. झोजिला पास उघडल्यानंतर, सियाचीन बेस कॅम्प पर्यटकांसाठी खुला झाला आहे. 15 जूनपासून गलवान व्हॅली पर्यटकांसाठी खुली होईल. सियाचीन बेस कॅम्पला जाण्यासाठी परवानगीची आवश्यकता राहणार नाही. पर्यटकांना गलवान खोऱ्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला भेट देता येईल. यामुळे लडाखच्या पर्यटनाला मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा - सैरावैरा पळणारे पर्यटक अन् गोळीबाराचा भीषण आवाज; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक VIDEO
लेहला देशाच्या इतर भागांशी जोडणारा झोजिला पास लवकर उघडल्यानंतर, सियाचीन बेस कॅम्प पर्यटकांसाठी खुला झाला आहे. त्याचप्रमाणे, पूर्व लडाखमधील गलवान व्हॅली देखील 15जूनपासून श्योक गावामार्गे पर्यटकांसाठी खुली केली जाईल. हे तेच ठिकाण आहे, जे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला (LAC) लागून आहे, जिथे पाच वर्षांपूर्वी हिंसक संघर्ष झाले होते. गलवान खोऱ्यात प्रवेश सध्या प्रतिबंधित आहे. लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिलच्या मुख्य कार्यकारी कौन्सिलर (सीईसी) ताशी ग्यालसन यांनी म्हटले आहे की, पर्यटकांना सियाचीन बेस कॅम्पला भेट देण्यासाठी कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.
पर्यटक सियाचीन-गलवानला पोहोचतील
अलीकडेच, सीईसी ताशी ग्यालसन यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. यामध्ये, लडाखच्या विविध भागातील विकासासोबतच पर्यटन आणि कनेक्टिव्हिटीबाबतही विशेष चर्चा झाली आहे. या शिष्टमंडळाला केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. ग्यालसन म्हणाले आहेत की 'गॅलवान व्हॅली पर्यटकांसाठी खुली होण्याची ही पहिलीच वेळ असेल.' 15 जून 2020 च्या रात्री भारतीय सैन्याने गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांविरुद्ध अतिशय शौर्याने लढा दिला. कमी संख्येने असूनही, कर्नल संतोष बाबू यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांचे मोठे नुकसान केले. अधिकृत अहवालांनुसार, भारताने यामध्ये 20 शूर सैनिक गमावले, परंतु चिनी सैन्याचे त्याहूनही जास्त नुकसान झाले.
लडाखकडे पर्यटकांचे आकर्षण आणखी वाढेल
झोजिला पास लवकर उघडल्यामुळे, सियाचीन बेस कॅम्पसह इतर पर्यटन स्थळे लवकर उघडण्याची संधी मिळाली आहे. सियाचीन बेस कॅम्प ही जगातील सर्वात उंच युद्धभूमी आहे. भारतीय सैन्य येथे नेहमीच तैनात असते. सियाचीन बेस कॅम्पमध्ये पर्यटकांना लष्करी सैनिकांच्या जीवनाबद्दल जाणून घेण्याची संधी मिळेल. त्यांना येथील कठीण परिस्थिती देखील समजेल. झोजिला खिंड लडाखला उर्वरित भारताशी जोडते. हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे ती सहसा बंद असते. ती लवकर सुरू केल्याने लेह-लडाखमधील पर्यटनाला चालना मिळेल. आता पर्यटक कोणत्याही अडचणीशिवाय सियाचीन बेस कॅम्पला जाऊ शकतील. सीमा रस्ते संघटनेने (BRO) झोजिला खिंड जलदगतीने उघडून एक मोठा टप्पा गाठला आहे.
हेही वाचा - पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील 'हे' 48 पर्यटन स्थळे बंद
गलवान पर्यटकांना आकर्षित करू शकते
गलवान व्हॅली प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LAC) पूर्वेकडील भागात आहे. या दरीभोवती खडकाळ भूभाग आहे. उत्तरेला काराकोरम पर्वतरांगा आहे. गलवान खोरे हे त्याच्या कठीण हवामान आणि सामरिक महत्त्वासाठी ओळखले जाते. हे भारत आणि चीनमधील वादग्रस्त प्रदेश अक्साई चीनजवळ आहे. या खोऱ्याचे नाव गुलाम रसूल गलवान यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. ते लडाखचा एक धाडसी संशोधक होते. 19 व्या शतकात त्यांनी अनेक युरोपीय संशोधकांना मदत केली. 1895 मध्ये ब्रिटीशांसोबत ट्रेकिंग करताना ते गलवान व्हॅली ओलांडणारा पहिली व्यक्ती असल्याचे मानले जाते. गलवान व्हॅली समुद्रसपाटीपासून 13,000 ते 14,000 फूट उंचीवर आहे. म्हणून, तिथे जाऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांना या आवश्यक खबरदारीचे पालन करावे लागेल.
साहसासाठी एक नवीन ठिकाण
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर ज्या प्रकारच्या हॉटेल बुकिंग रद्द झाल्याच्या बातम्या आल्या आहेत, त्यामुळे लेह-लडाखकडे पर्यटकांचे आकर्षण आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा वेळी, सियाचीन बेस कॅम्प आणि गलवान व्हॅलीला भेट देण्याच्या ज्या प्रकारे संधी उपलब्ध होत आहेत, त्यामुळे साहसी पर्यटकांना पर्यटनासाठी आणखी एक नवीन पर्याय मिळू शकतो.