पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय नौदलाचे 26 वर्षीय लेफ्टनंट विनय नरवाल यांचे पार्थिव इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या पत्नी हिमांशी यांनी ओक्साबोक्शी रडत निरोप दिला. आय एम प्राऊड ऑफ यू... जितकेही दिवस एकत्र होतो ते सर्वात सुंदर होते... आता मी कशी जगू? असे म्हणत त्यांनी विनयला सॅल्यूट करत 'जय हिंद'चा नारा दिला. हे दृश्य पाहून उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरळले.
विनय नरवाल आणि हिमांशी यांचा विवाह नुकताच 16 एप्रिल रोजी झाला होता. दोघं हनीमूनसाठी पहलगाममध्ये गेले होते. तिथे पोहोचल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी, 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात विनय शहीद झाले. त्यांच्या या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचं सावट पसरलं आहे.
हेही वाचा :जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा कांगावा; जबाबदारी नाकारत भारतावर उलटा आरोप
विनय हे हरियाणातील करनाल जिल्ह्यातील भुसली गावचे रहिवासी होते. त्यांचं कुटुंब सध्या करनाल शहरात राहतं. लग्नानंतर संपूर्ण परिसरात आनंदाचं वातावरण होतं. मात्र विनयच्या शाहिद झाल्याची बातमी येताच गावात शोककळा पसरली. त्यांच्या पित्यांसह बहिण आणि सासरे तात्काळ काश्मीरला रवाना झाले.
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विनय यांच्या पार्थिवावर नौदलप्रमुख एडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी पुष्प अर्पण करून श्रद्धांजली दिली. त्यांच्यासोबत हवाई दल प्रमुख आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनीही विनय यांना आदरांजली वाहिली.
पार्थिव देह दिल्लीहून करनालकडे रवाना करण्यात आला असून, आज संध्याकाळी करनालच्या मॉडेल टाऊनमधील स्मशानभूमीत विनय यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आला . या अंत्यविधीला हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी उपस्थित होते. विनय नरवाल त्यांच्या पत्नीचं धैर्य, प्रेम आणि अभिमान संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरलं आहे.