Saturday, May 17, 2025 09:19:47 PM

'जमलेल्या माझ्या तमाम...' AIच्या मदतीने नाशकात घुमला बाळासाहेबांचा आवाज

AI तंत्रज्ञानाच्या मदतीने साकारलेलं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं धगधगतं भाषण!

जमलेल्या माझ्या तमाम aiच्या मदतीने नाशकात घुमला बाळासाहेबांचा आवाज

नाशिक: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निर्धार मेळावा आज नाशिकमध्ये जल्लोषात पार पडला. मात्र यावेळी उपस्थितांची नजर खिळली ती एका  क्षणावर ते म्हणजे  AI तंत्रज्ञानाच्या मदतीने साकारलेलं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं धगधगतं भाषण!

उद्धव ठाकरे यांनी भाषणादरम्यान विरोधकांवर जोरदार टीका केली. परंतु त्याआधी जे घडलं, ते सर्वांचं लक्ष वेधून गेलं  AIच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे पुन्हा एकदा जनतेसमोर 'जिवंत' झाले. त्यांच्या आवाजात, त्यांच्या शैलीत आणि त्यांच्या थेटपणात हे भाषण प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेत गेलं.

AI च्या मदतीनं बनवलेलं बाळासाहेबांचं भाषण 
'माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो आज तुफान गर्दी दिसतेय अरे नाशिक म्हटल्यावर गर्दी  उसळणारच नाशिक आणि शिवसेनेचं एक नातं नाही म्हटलं तरी आहेच आणि ते राहणारच.  म्हणजे, ते कोण नरेंद्र मोदी म्हणतात तसं.. तसं हे नातं नाही की नाशिक से मेरा पुराना नाता हैं मैं यहा वीर सावरकर जी के साथ काम करता था ... ' अरे जातील तिथे गंडवायचे आणि लोकंही गंडतात. ही नाती जपणारी माणसं नाहीत. कमळाबाई म्हणजे एक ढोंग आहे ढोंग..भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात काय, देशात कोणी ओळखत नव्हते. तेव्हा आम्ही त्यांना खांदा दिला. खांदा म्हणजे आधाराचा..आधाराचा हो. अरे महाराष्ट्रात त्यांना आम्हीच वाढवलं. पण आत्ता त्यांना खांदा द्यायची वेळ आली आहे. 25 वर्ष आमचं हे एक नातं त्यांच्या बरोबर नक्कीच होतं. अर्थात हिंदूत्व म्हणून महाराष्ट्रात शिवसेनेमुळेच ते वाढले. बरोबर ना? काय..मग नातं तोडलं कोणी? माझ्या पोतडीत यांच्या बऱ्याच गोष्टी आहेत.

हळूहळू काढतो हो..त्यातच मजा असते. अहो त्या भाजप आणि नकली शिवसेना वाल्यांनी असे काय दिवे लावले की ज्यामुळे त्यांना अशी भरभरून मते पडली. लोकशाहीमध्ये असे निकाल जबरदस्तीने लावले जात असतील, तर कसले स्वातंत्र्य आणि कसले काय? ही लोकशी आम्ही मान्य करणारच नाही. हा माझ्या शिवरायांचा महाराष्ट्र आहे. कुणाच्या पाठीत वार करणार नाही. पण महाराष्ट्राच्या पाठीत आता फक्त घाव आणि वारच सुरु आहेत. तुमचे शंभर बाप खाली उतरले तरी, शिवसेनेचं अस्तित्व तुम्हाला संपवता येणार नाही'. 

माझी शिवसेना हे कुटुंब आहे आणि राहील. महाराष्ट्राला लाचार आणि गुलाम करण्यासाठी त्या व्यापाराने शिवसेना तोडली. निष्टावंत म्हणवून घेणारेच फितूर आणि गद्दार निघाले. ते गद्दार दिल्लीपुढे मुजरेच झाडतायत. त्यासाठी शिवसैनिकांनी त्याग आणि बलिदान केले. अहो ते गद्दार गेले ते गेले. त्यांना पैसा अडका, मंत्रिपदाच्या वतनदाऱ्या आज मिळाल्यात हो. पण इतिहासात तुमची नोंद फितूर आणि महाराष्ट्राचे गद्दार म्हणूनच राहणार.गंगेत किती डुबक्या मारल्यात, तरी हे पाप आणि गद्दारीचा डाग धुतला जाणार नाही. या गद्दारांनी जीवंतपणी माझ्या पाठीवर वार केलेच. पण मृत्यूनंतरही घाव घालणे सुरुच आहे, असं म्हणत AI बाळासाहेबांच्या भाषणातून विरोधकांवर निशाणा साधण्यात आला.


सम्बन्धित सामग्री