Tuesday, May 20, 2025 04:29:51 PM

40°C तापमानातून सुटका हवीयं? मग चला थंड महाराष्ट्रात..

मे महिन्यात महाराष्ट्रात उष्णतेने कहर केला आहे. अशा वेळी महाबळेश्वर, माथेरान, चिकहलदरा यांसारखी थंड ठिकाणं निवडून निसर्गात थोडा ब्रेक घेणं उत्तम ठरेल.

40°c तापमानातून सुटका हवीयं मग चला थंड महाराष्ट्रात

मुंबई: मे महिन्यात महाराष्ट्रात उष्णतेने कहर केला आहे. नागपूर, पुणे, नाशिकसारख्या शहरांमध्ये तापमान 40 अंश सेल्सियसच्या पुढे गेले असून, लोक घामाघूम झालेत. दुपारी घराबाहेर पडणंही मुश्किल झालंय. अशा वेळी आपण थोडा वेळ का होईना, उन्हाच्या कडाक्यापासून सुटका मिळवून निसर्गाच्या कुशीत जाऊन थोडा ब्रेक घेऊ शकत नाही का? महाराष्ट्रातच अशी काही थंड ठिकाणं आहेत जिथे तुम्हाला मिळेल आल्हाददायक हवा, हिरवळ आणि मन:शांती.

1. महाबळेश्वर (तापमान:18-25°C)

 

jaimaharashtranews

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे 1300 मीटर उंचीवर वसलेलं सुंदर हिल स्टेशन आहे. येथील हवामान उन्हाळ्यातही थंडगार राहतं. व्हेण्णा लेकवर बोटिंग करा, मॅप्रो गार्डनमधील स्ट्रॉबेरी मिल्कशेक प्या, आणि आर्थर सीटसारख्या पॉईंटवरून खोल दऱ्यांचं दृश्य अनुभवायला विसरू नका. जवळचं पाचगणी (तापमान: 20-26°C) देखील फिरायला उत्तम.

2. माथेरान (तापमान: 20-26°C)

jaimaharashtr
मुंबईपासून फक्त काही तासांवर असलेलं माथेरान हे भारतातील एकमेव वाहनमुक्त हिल स्टेशन आहे. येथे मोटारगाड्या बंद असल्यामुळे इथे शांतता आणि निसर्गशुद्ध हवा आहे. लुईसा पॉईंट, चार्लोट लेकसारख्या जागांवर निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्या. उन्हाळ्यात इथलं हवामान खूप सुखद राहतं.

3. भंडारदरा (तापमान: 18-25°C)

jaimaharashtranews

अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा हे एक शांत, हिरवळीत लपलेलं ठिकाण आहे. आर्थर लेक आणि विल्सन धरण याच्या मुख्य आकर्षणं आहेत. कळसूबाई शिखरावर ट्रेकिंग किंवा तारांगण निरीक्षणासाठी कॅम्पिंग हेही इथं करता येतं. इथलं थंड आणि स्वच्छ हवामान तुम्हाला नवी ऊर्जा देईल.

4. आंबोली (तापमान: 18–24°C)

jaimaharashtrnews

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीला महाराष्ट्राचं चेरापुंजी म्हणतात. घनदाट जंगलं, धुके आणि संथ वारे हे या ठिकाणाचं वैशिष्ट्य आहे. आंबोली घाटात फिरताना तुम्हाला दर 10 पावलांवर नवीन दृश्य दिसेल, ज्यात हरवून जायला होतं. उन्हाळ्यातही इथं गारवा अनुभवता येतो.

5. चिखलदरा (तापमान: 20–25°C)
jaimaharashttrnews


विदर्भातील नागपूर, अमरावती भागातील लोकांसाठी चिखलदरा ही थंड हवामानाची पर्वणी आहे. इथं मेळघाट व्याघ्र प्रकल्प, भीमकुंड आणि गविलगड किल्ला अशी अनेक निसर्गरम्य ठिकाणं आहेत. ट्रेकिंग, फोटोग्राफी, जंगल सफारीसाठी हे परफेक्ट.

6. तारकर्ली (तापमान: 30-32°C ;पण कमी आर्द्रता)

jaimaharshtrnews

कोकण किनाऱ्यावर वसलेलं तारकर्ली हे सागरी प्रेमींसाठी उत्तम ठिकाण आहे. उन्हाळ्यात इथं समुद्राच्या वाऱ्यामुळे हवा उबदार वाटत नाही. स्कुबा डायविंग, डॉल्फिन बोट सफारी आणि स्वच्छ पांढऱ्या वाळूचे किनारे यामुळे इथे एक वेगळीच मजा आहे.

उपयुक्त टिप्स:

सुट्ट्यांमध्ये गर्दी टाळण्यासाठी हॉटेल्स आधी बुक करा.
हलकी, कॉटनची कपडं, टोपी आणि सनस्क्रीन वापरा.
प्रवासासाठी सकाळची किंवा संध्याकाळची वेळ निवडा.

उन्हाच्या तडाख्यातून दूर पळत असाल तर हे थंड आणि निसर्गरम्य ठिकाणं तुम्हाला हवी असलेली विश्रांती देतील. यंदा उन्हाळा जरा हटके साजरा करा ,थंड हवेमध्ये, सुंदर निसर्गाच्या सहवासात. 


सम्बन्धित सामग्री