नागपूर: मुर्ती येथील प्रफुल्ल देशभ्रतार आणि त्यांच्या पत्नी मेघा, कोराडी येथील पुथ्वीराज वाघमारे आणि त्यांच्या पत्नी मनिषा, मुली श्रेयषा आणि एकता हे सर्वजण श्रीनगर येथे फिरण्यासाठी गेले होते. मात्र, मंगळवारी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी हे दोन्ही कुटुंब घटना स्थळापासून थोड्याच अंतरावर होते. ज्या गाडीतून दहशतवादी हल्लेखोर आले होते, त्या गाडीला पाहताच प्रफुल्ल देशभ्रतार यांना संशय आला. प्रफुल्ल यांनी एका स्थानिक घोडेवाल्याकडे चौकशी केली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ही माहिती दिली. दहशतवादी हल्ल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रफुल्ल यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सांगितले की, 'आम्ही श्रीनगर येथील एका हॉटेलमध्ये सुखरूप पोहोचलो.' यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर दिला. त्यासोबतच, त्यांनी देशभ्रतार आणि वाघमारे कुटुंबीयांना लवकरात लवकर नागपूरला आणण्यासाठी प्रशासनाला त्यांची संपूर्ण माहिती देत विनंती केली.
नागपूरमध्ये देखील हाय अलर्ट जारी
कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नागपूरमध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. शहरातील संघ मुख्यालय, रेशीबाग येथील स्मृतिमंदिर परिसर, दीक्षाभूमी, नागपूर रेल्वेस्थानक आणि नागपूर विमानतळ या परिसरात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. नागपूर शहरातील संशयास्पद हालचालींवर पोलिसांची करडी नजर आहे.
हेही वाचा: पहलगाम दहशतवाद हल्ल्याप्रकरणी शिवसेना आक्रमक; पाकिस्तानी झेंडा जाळत केला निषेध
नागपूर जिल्ह्यातील 45 पर्यटक काश्मीरमध्ये
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील 45 पर्यटक काश्मीरमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शाखा या सर्व 45 जणांच्या संपर्कात आहे. त्यापैकी तीन-चार लोक वगळता, बहुतेक श्रीनगर किंवा जवळच्या सुरक्षित ठिकाणी आहेत. मंगळवारी दहशतवादी हल्ला झाल्याच्या वेळी रूपचंदानी कुटुंबीय पहलगामला होते. दहशतवादी हल्ल्यामुळे पहलगाम येथे अडकलेले पर्यटक सातत्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शाखेला संपर्क करत आहेत. त्यामुळे 45 चा आकडा वाढण्याची शक्यता आहे.