जळगाव: काश्मीरमधील पहलगाम जवळील बैसरन व्हॅलीमध्ये नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यात जळगावच्या दोन महिला पर्यटकांनी थरारक अनुभव घेतला. किशोरी वाघुळदे आणि रेणुका भोगे यांनी जय महाराष्ट्र न्यूजशी संवाद साधताना त्यांच्या अंगावर काटा आणणाऱ्या क्षणांची सविस्तर माहिती दिली.
बैसरन खोऱ्यात फेरफटका मारताना अचानक सुरू झालेल्या गोळीबाराने एकच गोंधळ उडाला. अवघ्या 300 ते 400 मीटर अंतरावरून त्यांनी प्रत्यक्ष गोळीबार पाहिला. काही महिला रडू लागल्या, तर एका महिलेची प्रकृती बिघडून ती बेशुद्ध झाली. घटनास्थळी असलेल्या सीआरपीएफच्या जवानांनी तातडीने पर्यटकांना लपण्याचे आदेश दिले. काहीजणांनी लाकडी शेडमागे लपून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.
किशोरी वाघुळदे सांगतात, दहशतवाद्यांनी पुरुषांवर थेट हल्ला चढवला. काही महिला व मुली जखमी झाल्या. जवळच एका महिलेच्या पतीला गोळी लागल्याचे आम्ही प्रत्यक्ष पाहिले. अशा भीषण परिस्थितीत प्रत्येकजण आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत होता.
हेही वाचा: भेकडया पाकिस्तानला चीनचा आधार; दहशतवादी हल्ल्यावर निष्पक्ष चौकशीची मागणी
हल्ल्यानंतर दहा मिनिटांत भारतीय लष्कराच्या अधिक जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. हेलिकॉप्टर व गाड्यांद्वारे मदत पोहोचवण्यात आली. पर्यटकांना बसमध्ये बसवून काचेवर पडदे लावले गेले आणि त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली.
घटनास्थळी सुरक्षेची कमतरता जाणवली, असे किशोरी वाघुळदे म्हणाल्या. एवढ्या मोठ्या परिसरात मोजके जवान असणे धोकादायक ठरल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी भविष्यात अधिक कडक सुरक्षा तैनातीची गरज व्यक्त केली.
या भीषण घटनेत स्थानिक मुस्लिम नागरिकांनीही मोठ्या धैर्याने मदत केली. घोडेवाले, हॉटेल चालक आणि विक्रेत्यांनी पर्यटकांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला. त्यामुळे हा हल्ला धर्मभेद न करता फक्त दहशतीचा प्रयत्न असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी स्पष्ट केले.
रेणुका भोगे यांनी सांगितले, काश्मीरला धरतीवरचं स्वर्ग म्हटलं जातं, पण त्या दिवशी आम्ही नरकयातना अनुभवल्या. अचानक सुरू झालेल्या गोळीबारामुळे आम्हाला कळेनासं झालं होतं की कोण मित्र आहे आणि कोण शत्रू. जवानांच्या मदतीने आम्ही वाचलो.
त्या दिवशी एका महिलेने आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी दहशतवाद्यांशी विनंती केली. दुर्दैवाने ती महिला आणि तिचा नवरा दोघेही गोळीबारात मृत्युमुखी पडले. या दुर्दैवी घटनेचे साक्षीदार असलेल्या किशोरी व रेणुकाने, ही मानवतेची लढाई होती, असे म्हणत भारतीय जवानांचे मनःपूर्वक आभार मानले.